Uddhav Thackeray News, Girish Mahajan News Latest Marathi News
Uddhav Thackeray News, Girish Mahajan News Latest Marathi News Sarkarnama
पुणे

खासदार,आमदारांसह पक्षही निसटल्याने ठाकरे अस्वस्थ...

उत्तम कुटे

पिंपरी : महाराष्ट्रात तळेगाव दाभाडे (ता.मावळ,जि.पुणे) येथे होऊ घातलेला दीड लाख कोटी रुपयांचा, दीड लाख रोजगार निर्माण करणारा वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. त्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीत तू, तू, मैं, मैं सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने त्याविरोधात सुरु केलेल्या आंदोलन व टीकेनंतर त्याला आता भाजपही प्रत्युत्तर देऊ लागली आहे.

महाविकास आघाडी सरकार व त्यातही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या चुकीमुळे हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये आज (ता.२२) केला. (Mahajan News Latest Marathi News)

मुंबई महापालिका प्रशासनाने दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगी नाकारली असल्याने आता शिवाजी पार्कऐवजी दुसरे मैदान घेण्याचा सल्ला महाजन यांनी ठाकरेंना यावेळी दिला. खासदार,आमदारांसह पक्षही निसटल्याने ते सध्या अस्वस्थ आहेत. त्यातूनच त्यांनी कालच्या मुंबईतील मेळाव्यात एका महिन्यात निवडणूक घेऊन दाखवा, अशी आत्याबाईंना मिशा असल्यासारखी वक्तव्ये केली आहेत, असा हल्लाबोल महाजन यांनी केला. तसेच ते शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आपले अस्तित्व दाखविण्याची, टिकविण्याची केविलवाणी धडपड त्यांची सध्या सुरु आहे, असे ते म्हणाले. ग्रामपंचायत निवडणुकीत ते शेवटच्या नंबरवर गेले असून त्यातून त्यांना आत्मपरिक्षणाची गरज असल्याचा टोलाही महाजनांनी लगावला. त्यामुळे त्यांनी आता संयम ठेवावा, नाहीतर त्याचे परिणाम उलटे होतील,असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी ठाकरेंना दिला आहे.

केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या विद्यमाने 'स्वच्छ व हरित ग्राम' व 'जलसमृद्ध गाव' या शाश्वत समान विकास ध्येयावर आधारित तीन दिवशीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते महाजनांच्या उपस्थितीत आज चिंचवड येथे झाले. त्यानंतर महाजन यांनी ठाकरे व मविआ सरकारवर वेदांत-फॉक्सकॉनवरून कडाडून टीका केली, तर आपल्या पक्षाचा म्हणजे भाजपचा बचाव यावेळी केला.

वेदांतकडून राज्य सरकारला ७ जानेवारीला पत्र देण्यात आले होते. पण, त्यावर चर्चा करण्यासाठी सरकार जाईपर्यंत ठाकरे यांना सहा महिने वेळ भेटला नाही. त्यामुळे ते सत्तेत असतानाच या प्रकल्पाने राज्याबाहेर जाण्याचा निर्णय घेतला, असा दावा महाजनांनी केला. वायनरी व दारूवरील टॅक्स कमी करण्यासाठी आग्रही असणारे ठाकरे आणि त्यांच्या सरकारला वेदांतसाठी एक बैठक घ्यायला वेळ मिळाला नाही, आमदार, खासदारांनाही ते भेटले नाहीत, मंत्रालयाची पायरी चढले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT