Bala Bhegade - Mahesh Landge - Shrirang Barne  Sarkarnama
पुणे

Pimpri - Chinchwad Politics : भाजपच्य़ा बाळा भेगडेंचा स्वपक्षीय आमदार लांडगेनंतर आता शिवसेनेच्या खासदार बारणेंनाही 'खो'

सरकारनामा ब्यूरो

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad : केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेत देशातील रेल्वे स्थानकांचा विकास केला जात आहे.त्यात मावळातील तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनच्या नुतनीकरण,विस्ताकीरण आणि आधुनिकीकरणावर चाळीस कोटी ३५ लाख रुपये खर्च होणार आहेत.या कामाचे भुमीपूजन येत्या रविवारी (ता.६) पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन करणार आहेत.

दरम्यान, या रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाचे काम सुरु होण्याअगोदरच त्यावरून श्रेयाचे राजकारण रंगले आहे. मावळचे शिवसेना (शिंदे) खासदार श्रीरंग बारणे(Shrirang Barne) आणि मावळचे भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्यात हा कलगीतुरा रंगला आहे. तळेगावच नाही,तर पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी,चिंचवड आणि शहराजवळील देहूरोड अशा एकूण चार रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण,विस्तारीकरण आपल्य़ा पाठपुराव्यामुळे झाल्याचा दावा खासदार बारणे यांनी केला होता.

आपल्याच प्रयत्नामुळे या स्थानकांचा समावेश अमृत योजनेत झाल्याचे त्यांनी म्हटले होते.तर, आमदार बाळा भेगडे (Bala Bhegade) यांनी आपल्या प्रयत्नामुळे तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनचा समावेश अमृत योजनेत झाल्याचा प्रतिदावा आज ठोकत खासदार बारणेंना खो दिला.त्यामुळे नक्की कोणाच्या प्रयत्नातून हे काम होत आहे,याची खमंग चर्चा मावळातच नाही,तर पिंपरी-चिंचवडमध्येही रंगली आहे.

भेगडेंनी शिवसेनेच्या खासदार बारणेंना खो देण्यापूर्वी त्यांनी तो आपल्याच पक्षाचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनाही गेल्या महिन्याच्या २७ तारखेला दिला होता. पिंपरी-चिंचवडसाठी मावळातील पवना धरणातून नदीत पाणी सोडले जाते. त्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्यामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरासाठी पवना धरणातून बंद जलवाहितून पाणी आणण्याची योजना सुरु केली होती. तिला त्यावेळी विरोधातील भाजपने त्याला कडाडून विरोध केला होता. भेगडेंनीही तो केला.

दरम्यान,त्याविरोधात ९ ऑगस्ट २०१११ ला झालेल्या पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे रोको आंदोलनाला हिंसक वळण मिळाले.त्यात तिघांचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाल्याने ही योजना गुंडाळण्यात आली होती.तर, दुसरीकडे वाढत्या नागरिकीकरणामुळे उद्योगनगरीत सध्या दिवसाआड पाणीपुरवठा गेल्या पावणेचार वर्षापासून सुरु आहे. त्यामुळे ही योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी आमदार लांडगे(Mahesh Landge) यांनी लक्षवेधीव्दारे विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात २७ जुलैला केली होती. त्याला लगेचच भेगडेंनी विरोध करत लांडगेंना खो दिला होता.

भारतीय रेल्वे दररोज चौदाशे मेल,एक्सप्रेस गाड्यांतून अडीच कोटी प्रवाशांची ने-आण करते. रेल्वेच्या साडेसात हजारपैकी महत्वाच्या आणि मोठ्या बाराशे स्टेशनचा विकास,आधुनिकीकरण आणि नुतनीकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प रेल्वे खात्याने हाती घेतला आहे. त्यात मध्य रेल्वेची ७६ स्टेशन आहेत.

त्यातील पहिल्या टप्यात तळेगाव आण आकुर्डी स्टेशनचे हे काम ७३ कोटी रुपये खर्चून केले जाणार आहे.या कामाचे ऑनलाईन भूमिपूजन पंतप्रधान परवा करणार आहेत.पुणे मेट्रोच्या दोन मार्गाच्या दुसऱ्या टप्यांचे असेच ऑनलाईन उदघाटन मोदींनी नुकत्य़ाच पुणे दौऱ्यात केले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT