<div class="paragraphs"><p>Shivajirao&nbsp;Adhalrao patil - bullock cart race</p></div>

Shivajirao Adhalrao patil - bullock cart race

 

sarkarnama

पुणे

शिवाजीराव आढळराव पाटलांसमोरच महाविकास आघाडीचा निषेध

सरकारनामा ब्युुरो

पुणे : कोविड १९ च्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील चिंचोडी आणि मावळ तालुक्यातील नानोली तर्फे चाकणमधील आज होणाऱ्या बैलगाडा शर्यतीला पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी दिले आहेत. काल जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत या बैलगाडा शर्यतीच्या (bullock cart race) परवानगीचा पुनर्विचार करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या शर्यतीसाठी पोलिसांनी दिलेला ना हरकत दाखला रद्द केला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर शिरूरचे माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adhalrao patil) चांगलेच संतप्त झाले. रात्रीच्या अंधारात या शर्यती (bullock cart race) रद्द केल्याचा आरोप करत त्यांनी या निर्णयाचा निषेध केला. तसेच अनेक बैलगाडा मालक चालकांच्या सोबतीने त्यांनी बैलगाडा घाटात ठिय्या मांडला. त्यांच्याच नेतृत्वात त्यांच्या लांडेवाडी गावात शितलाईदेवी यात्रेनिमित्त या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आढळराव पाटील यांच्या समोरच समर्थकांनी महाविकास आघाडी आणि जिल्हा प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

यावेळी आढळराव पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या भावनांशी जर कोणी खेळत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. साडे सात वर्षांच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला (bullock cart race) परवानगी दिल्यानंतर अशाप्रकारे जिल्हा प्रशासनाने रात्रीच्या अंधारात निर्णय जाहीर करणे हे मला कुठे तरी चुकीचं आणि काळं-बेर वाटलं. जिल्हाधिकारांच्या निर्णयांचा आम्ही सन्मानच करतो, पण त्यांनी काहीसा आधी हा निर्णय जाहीर करायला हवा होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने संध्याकाळी ६ वाजता फोन करुन उपाययोजनांचा अहवाल पाठवायला सांगितला. त्यानंतर या अहवालावर समाधान व्यक्त करत चांगल्या उपाययोजना असल्याचे सांगितले.

मात्र रात्री ८ वाजता पोलिसांनी येवून सांगितले की कदाचित तुम्हाला बैलगाडा शर्यती स्थगित करायला लागतील आणि त्यानंतर ११ वाजता जिल्हाधिकारी आदेश काढतात, हे कुठेतरी चुकीचे आहे, असे म्हणत आढळराव पाटील यांनी या निर्णयामागे राजकारण होत असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, लांडेवाडी या गावामध्ये आढळरावांच्या नेतृत्वातच महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पार पडणार होती. पण ही गोष्ट काही लोकांना पटली नाही, त्यांच्या डोळ्यात खुपत होती, त्यामुळेच ही शर्यत बंद पाडण्यात आली, असा नाव न घेता त्यांनी आरोप केला.

पुणे जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोविड पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. २६ डिसेंबर रोजी जिल्ह्यात १५८ रुग्ण आढळले होते. तर दुसऱ्या दिवशी हा आकडा २४७ वर गेला होता. त्यानंतर २८ डिसेंबरला - २८२, २९ डिसेंबर - ४०४, ३० डिसेंबर - ४७७, ३१ डिसेंबर - ६८३ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT