Chandrakant Patil - Uddhav Thackeray
Chandrakant Patil - Uddhav Thackeray Sarkarnama
पुणे

'आघाडी सरकारने पोलिसांना शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करून टाकले आहे'

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) राजकारणासाठी सत्तेचा व पोलिसांचा (Pimpri Police) दुरुपयोग चालविला आहे. पोलिस प्रचंड दबावाखाला काम करत आहेत. यामुळेच पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचे (Shivsena) जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे (Gajanan Chinchwade) हे त्याची शिकार झाले आहेत. चिंचवडेंनी भाजपामध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर त्यांची १९७१ ची जमिनीची केस काढून पोलिसांनी त्यांचा प्रचंड छळ केला यामुळेच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर व पिंपरी पोलिसांवर केला आहे. ते (ता.22 फेब्रुवारी) कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने राजकारणासाठी सत्तेचा व पोलिसांचा दुरुपयोग चालविला आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेले जात असून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार चालू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची १९७१ ची जमिनीची केस काढून पोलिसांनी त्यांचा छळ केला. अखेरीस त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू जरी हृदयविकाराच्या झटक्याने झाला असे दाखवण्यात येत असले तरी त्यांचा मृत्यू हा पोलिसांनी केलेल्या छळामुळेच झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

चिंचवडेंच्या मृत्यूनंतर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांची आपण भेट घेतली आणि त्यांनाही याबाबत सांगितले की, आपली पोलिस स्टेशन ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांप्रमाणे करून टाकली आहे. पक्षांतरासाठी भाजप कार्यकर्त्यांना पकडून पोलिस स्टेशनमध्ये दोन-दोन तास बसवले जात असून पक्षांतरासाठी प्रचंड दबाव टाकला जात आहे. मात्र, जनता अशा लोकांना धडा शिकवेल आणि आम्हीही असला प्रकार सहन करणार नाही, असे पाटलांनी महाविकास आघाडी सरकारला ठणकावले.

याबरोबरच पाटीलांनी पत्रकार परिषदेत आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दिशा सालियान मृत्यूप्रकरणी पाटील म्हणाले की, याबाबत काहीही राजकारण होत नाही. सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील, दूध का दूध–पाणी का पाणी होईल, कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल हे स्पष्ट होईल. सध्या त्यामुळेच उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो तसा हा प्रकार आहे. महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. त्यांच्यासाठी कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात सात मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. त्यातून त्यांना पळता भुई थोडी होईल व त्यातून हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे. असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो, असा इशाराही पाटील यांनी शिवसेना व महाविकास आघाडींच्या नेत्यांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT