Bala Bhegade, Devendra Fadnavis Latest News
Bala Bhegade, Devendra Fadnavis Latest News Sarkarnama
पुणे

फडणवीसांनी आदेश दिला अन् शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यातील कृषिपंप वीज ग्राहकांकडून सक्तीची वसुली थांबविताना फक्त चालू बीलाचीच वसूली करा आणि कुणाचेही कृषी वीज कनेक्शन तोडू नये,असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले अन् त्यानुसार महावितरणने राज्यभर आदेश जारी केल्याची माहिती भाजप (BJP) नेते आणि माजी आमदार बाळा भेगडे यांनी दिली. या आदेशामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. (Bala Bhegade, Devendra Fadnavis Latest News)

सध्या राज्यातील शेतकऱ्यांकडून वीजबिल थकल्याने महावितरणने कारवाईचा बडगा उगारत शेतीपंपाचे वीजजोड तोडण्याची मोहीम सुरु केली होती. अगोदर कोरोना व अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असताना राज्यभर शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच वीजबिल न भरल्याने शेतीच्या पंपाचे वीजजोड तोडण्यात येत होते.

दरम्यान, याबाबत भेगडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत मागील काही दिवसांपासून पाठपुरावा सुरू ठेवला होता. शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीबाबत विचार करून राज्यशासनाने चालू वीजबिल भरण्याबाबत आदेश दिले आहेत. यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे भेगडेंनी सांगितले.

आदेशात म्हटले आहे की, कृषी ग्राहकांकडून एका चालू वीज देयकाचा भरणा करुन घेण्यात यावा, या व्यतिरिक्त इतर कोणताही पर्याय किंवा जास्तीच्या थकबाकी वसूली करिता सक्ती करण्यात येवू नये. सध्या कृषी वीज देयक वसुलीबाबतचे वेगवेगळे निकष, जसे एक चालू वीज देयक अथवा दोन चालू वीज देयके किंवा इतर अशाप्रकारे लावण्यात येत असल्यामुळे कृषी ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

महावितरणने नवील आदेश देत त्याची काटेकोरपणे व तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना महावितरणला दिल्या आहेत.याबाबत राज्यशासनाने सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक,कोकण औरंगाबाद-पुणे-नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या सर्व अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आला आहे.

दरम्यान, सप्टेंबर २०२२ अखेर कृषी ग्राहकांकडील एकूण थकबाकी ४६ हजार ४७ कोटी झाली आहे. चालु आर्थिक वर्षात ग्राहकांकडून फक्त २९७ कोटीचा भरणा करण्यात आला आहे. कंपनीची आर्थिक परिस्थिती विचारात घेता कृषी ग्राहकांनी किमान चालू वीज देयकाचा भरणा करणे आवश्यक आहे.सप्टेंबर तिमाहीसाठीची १ हजार ५१९ कोटीची चालू वीज देयके ग्राहकांना देण्यात आलेली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT