Mahatma Jyotirao Phule Revenue Lok Adalat  sarkarnama
पुणे

Land Disputes Case : जमिनीचे वाद आता कोर्टाबाहेरच मिटणार! सरकारचा 'मास्टर प्लॅन' तयार! राज्यभर अभियान

Mahatma Jyotirao Phule Revenue Lok Adalat : अनेक वर्षांपासून जमीनचे वादाच्या खटले सुरू आहेत. हे वाद परस्पर संमतीने निकाली काढण्यासाठी सरकार महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान राबवणार आहे.

Sudesh Mitkar

Pune News : जमिनीच्या वाढत्या किमतींसोबतच जमिनीशी संबंधित महसुली वादांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महसूल विभागातील अर्धन्यायिक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहत असल्याने पक्षकारांना न्यायासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. हीच प्रतीक्षा संपवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे.

१ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे. मंडल अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी प्रांत तसेच अपर जिल्हाधिकाऱ्यांकडील अर्धन्यायिक महसुली दावे दोन्ही पक्षकारांच्या परस्पर संमतीने तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे.

महसूल प्रशासनातील विविध स्तरांवर दाखल झालेले अनेक दावे विविध कारणांमुळे प्रलंबित राहतात. विशेषतः जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वादांची संख्या मोठी आहे. एखाद्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतरही एका पक्षाचे समाधान न झाल्यास वरिष्ठ पातळीवर पुन्हा दाद मागितली जाते. त्यामुळे वाद आणखी लांबतो.

अशा प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांना तडजोडीची संधी उपलब्ध करून देत परस्पर सहमतीने वाद संपविण्याचा प्रयत्न या लोकअदालतीच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना महसूल न्यायालयांच्या फेऱ्यांपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

तडजोडीसाठी अर्ज करता येणार

प्रलंबित दाव्यातील दोन्ही पक्षकार किंवा त्यांचे वकील संयुक्तपणे विहित ‘प्रपत्र-अ’ मध्ये तडजोडीसाठी अर्ज करू शकतील. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर दोन्ही पक्षांच्या इच्छेनुसार आणि कायदेशीर तरतुदींनुसार तडजोडनामा तयार केला जाणार आहे.

लोकअदालतीच्या निश्चित दिवशी दोन्ही पक्षांची संमती घेत अंतिम आदेश पारित करून संबंधित प्रकरण निकाली काढण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या वादांना सामंजस्याच्या माध्यमातून कायमचा पूर्णविराम देण्याची संधी पक्षकारांना मिळणार आहे.

गावपातळीपर्यंत अभियानाची माहिती

या अभियानाचा लाभ राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत आणि विशेषतः शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व तहसील, उपविभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळांवर तसेच कार्यालयीन फलकांवर अभियानाची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.

अहवाल शासनाला सादर करणार

याशिवाय ग्राम महसूल अधिकारी आणि मंडल अधिकारी कार्यालयांमध्येही लोकअदालतीबाबत माहितीचे फलक लावण्यात येणार आहेत. अभियानाच्या अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला सादर केला जाणार आहे.

महसुली दाव्यांचा वाढता प्रलंबित भार कमी करण्यासोबतच नागरिक आणि शेतकऱ्यांना जलद, सुलभ आणि सामंजस्यपूर्ण पद्धतीने न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT