ajit pawar Harshvardhan Patil .jpg sarkarnama
पुणे

Harshvardhan Patil : नाराज हर्षवर्धन पाटील अजितदादांवर संतापले; म्हणाले, महायुतीचे...

Akshay Sabale

भाजप नेते, हर्षवर्धन पाटील हे पक्षात नाराज असून शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे. त्याचं कारण आहे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इंदापुरात जाऊन दत्तात्रय भरणे यांची अप्रत्यक्षपणे घोषित केलेली उमेदवारी. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी 'तुतारी' हाती घ्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.

त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील ( Harshvardhan Patil ) यांनी इंदापुरातील आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत भावना जाणून घेतल्या. यानंतर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना हर्षवर्धन पाटील हे अजितदादांवर चिडल्याचे पाहायला मिळाले. "महायुतीचे जागावाटप झाले का?" असा संतप्त सवाल हर्षवर्धन पाटील यांनी अजितदादांना विचारला आहे.

मी निवडणूक लढवावी, असा जनतेचा आग्रह...

हर्षवर्धन पाटील म्हणाले, "मी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे. काहीजण अपक्ष, काहीजण तुतारी, तर काहीजण जागा सोडवून घ्या, असं म्हणतात. इंदापुरातून मी निवडणूक लढवावी, असा जनतेचा आग्रह आहे. मी जनतेचं मत जाणून घेणार आहे."

शासकीय कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रण नव्हतं

"महायुती तीन पक्षांची आहे. तीन पक्षांनी एकत्र बसून निर्णय घ्यायचे होते. पण, अजितदादा ( Ajit Pawar ) पक्षाच्या मेळाव्यानिमित्त आणि शासकीय कार्यक्रमासाठी इंदापुरात आले, तेव्हा, महायुती म्हणून शासकीय कार्यक्रमात आमच्यासारख्यांना निमंत्रित केलं पाहिजे होते. उद्घाटनाचे कार्यक्रम एका पक्षाचे नाही. त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची नावे कोनशिलावर आणि पत्रिकेत होती. मात्र, आम्हाला निमंत्रण नव्हतं," अशी नाराजी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

महायुतीत नेमकं काय सुरू आहे?

"यावेळी तुमची पुढील कामे करण्यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधींना संधी द्या, असे सूतोवाच अजितदादांनी केले. मात्र, महायुतीचे जागावाटप झाले का? जागा देण्याचा निर्णय झाला का? कागलमध्येही हसन मुश्रीफ यांचं तिकीट जाहीर करण्यात आले. आमच्याशी कुणीही बोलायला आणि संपर्क साधण्यास तयार नाही. त्यामुळे महायुतीत नेमकं काय सुरू आहे? हे देवेंद्र फडणवीस यांना विचारणार आहे," अशी खदखद हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

आमचं नेमकं काय चुकतं?

"निवडणुका आल्यावर सगळेच लोक संपर्कात असतात. मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठकीला गेलो होतो, तिथे शरद पवारासाहेबांची भेट झाली. अनेक नेते बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे साहजिक चर्चेला उधाण येणार आहे. लोकसभेवेळी झालेल्या चर्चेचं पुढे काय झालं? दरवेळी इंदापूर तालुक्यावर ही वेळ का येते? आमचं नेमकं काय चुकतं?" असे सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT