Pune Metro latest development 2026: पुणेकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा देणाऱ्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची प्रतीक्षा आणखी लांबणार आहे. जूनमध्ये मेट्रो सुरू होईल, असा गाजावाजा प्रशासनाकडून केला जात असतानाच आता तो मुहूर्तही हुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१५ जूनपासून सेवा सुरू करण्याचे नियोजन केवळ कागदावरच राहिले असून आता जुलै महिन्याचा नवा शब्द पुणेकरांना दिला जात आहे. मात्र वारंवार बदलणाऱ्या तारखांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर ही पुण्यातील अत्यंत महत्त्वाची मेट्रो मार्गिका मानली जाते. पुण्याच्या आयटी हबला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या या २३ किलोमीटरच्या मार्गिकेवर २३ स्थानके आहेत. दररोज हिंजवडी आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या लाखो कर्मचारी आणि वाहनचालकांसाठी ही मेट्रो मोठा दिलासा ठरणार होती. पण गेली अनेक वर्षे फक्त घोषणा, उद्घाटनाच्या तारखा आणि आश्वासनांचाच पाऊस सुरू आहे.
मूळ नियोजनानुसार ही मेट्रो मार्च २०२५ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र त्यानंतर सप्टेंबर २०२५, डिसेंबर २०२५, मार्च २०२६, मे २०२६ आणि नंतर १५ जून २०२६ अशा अनेक तारखा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्या. प्रत्येक वेळी “काम अंतिम टप्प्यात” असल्याचे सांगितले गेले, पण प्रत्यक्षात मेट्रो सेवा सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे पुणेकर आता प्रशासनाच्या आश्वासनांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात माण ते रामनगर (बाणेर) या १२ स्थानकांदरम्यान मेट्रो सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या भागातील काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा पीएमआरडीएकडून केला जात असला तरी उर्वरित कामे अजूनही सुरूच आहेत. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CMRS) या महिन्याच्या अखेरीस तपासणी होणार असून त्यानंतर त्रुटी दूर करून अंतिम मंजुरी घेतली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सेवा सुरू होण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी १२ स्थानकांपर्यंतची कामे अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले आहे. मात्र “अंतिम टप्पा” हा शब्द पुणेकर गेली दोन वर्षे ऐकत असल्याने नागरिकांमध्ये आता अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च महिन्यात पहिला टप्पा मेमध्ये आणि दुसरा टप्पा जुलैमध्ये सुरू होईल, असे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र मे महिना उलटून गेला तरी सेवा सुरू झाली नाही. आता जुलैची नवी मुदत देण्यात येत आहे. त्यामुळे “नेमकी जबाबदारी कोणाची?” असा सवाल पुणेकर विचारत आहेत.
दररोज हिंजवडी, वाकड, बाणेर आणि शिवाजीनगर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या वाहनचालकांची अवस्था बिकट झाली आहे. अनेकांना ऑफिस गाठण्यासाठी दोन-दोन तास रस्त्यावर काढावे लागत आहेत. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनते. अशा वेळी मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण न होणे म्हणजे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे उदाहरण असल्याची टीका आता उघडपणे केली जात आहे.
दुसऱ्या टप्प्यात बाणेर हाय स्ट्रीट ते शिवाजीनगर या ११ स्थानकांपर्यंत मेट्रो ऑक्टोबरमध्ये सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे. मात्र वारंवार हुकणाऱ्या मुदती पाहता आता पुणेकरांचा संयम सुटू लागला आहे. “जुलैचा नवा मुहूर्त तरी पाळणार का?” हा प्रश्न सध्या पुणेकर विचारताना दिसत आहे.
मार्च २०२५
सप्टेंबर २०२५
डिसेंबर २०२५
मार्च २०२६
मे २०२६
१५ जून २०२६
जुलै २०२६
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.