shivsena
shivsena sarkarnama
पुणे

इतिहास तर चिन्ह गोठविण्याचाच ; शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे काय होणार ?

उमेश घोंगडे

पुणे : निवडणूक चिन्हावर वाद झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India) संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा भारतीय लोकशाहीतला इतिहास आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court Of India) मंगळवारच्या निकालानंतर निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे (Shivsena) धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठविले जाण्याचीच शक्यता अधिक असल्याचे राजकीय अभ्यासक सांगत आहेत.

गेल्या पन्नास-साठ वर्षांच्या राजकीय इतिहासाचा अभ्यास केल्यास या प्रकरणाची अनेक उदाहरणे समोर येतील. आतापर्यंत ज्या-ज्यावेळी पक्षात फूट पडली किंवा चिन्हाबद्दल वाद झाला त्या-त्यावेळी हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात गेला. आजपर्यंतच्या अशाप्रकारच्या मूळ निर्णयात पक्षाचे चिन्ह गोठविण्यात आले आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या बाबतीत असेच होण्याची शक्यता असल्याचे राजकीय अभ्यासक सांगत आहेत. परिणामी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही नवीन चिन्हाचा शोध घ्यावा लागण्याची शक्यता अधिक आहे.

राष्ट्रीय काँग्रेसचे प्रथम 'बैलजोडी' चिन्ह १९६९ साली गोठविण्यात आले, त्यानंतर काँग्रेसला दिलेले 'गाय वासरू' चिन्ह देखील गोठविण्यात आले. त्यानंतर काँग्रेसला 'हाताचा पंजा' हे चिन्ह दिले. १९८० जनता पक्षात फूट पडली त्यावेळी "नांगरधारी शेतकरी" हे चिन्ह गोठविण्यात आले. त्यानंतर भारतीय जनता पार्टी या नव्या पक्षाची स्थापना झाली.या पक्षाला कमळ चिन्ह देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळी या पक्षाने चरखा चिन्हाची मागणी केली. परंतु चरखा चिन्ह गोठविले असल्यामुळे घड्याळ हे चिन्ह देण्यात आले. अशाच प्रकारच्या घटना इतर पक्षांच्या बाबतीमध्ये यापूर्वीदेखील झालेल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर निवडणूक आयोगाच्या सुनावणीस लवकरच सुरवात होईल. येत्या एक-दोन महिन्यात निर्णय होणे अपेक्षित आहे. निवडणूक आयोग पारदर्शीपणे निर्णय घेईल, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंगळवारी लगेचच देण्यात आले. निवडणूक आयोगापुढे होणारी दोन्ही बांजूंची सुनावणी व त्यानंतर होणाऱ्या निर्णयाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहणार आहे.

निवडणूक आयोगाकडून सुनावणीला दोन-तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागला तरी त्याचा फटका शिवसेनेच्या दोन्ही गटांना बसणार आहे. या काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यास या दोन्ही गटांना धनुष्यबाणाशिवाय इतर चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी लागणार आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोचले आहे.त्यामुळे नवे चिन्ह घेऊन मतदारांपर्यंत जाणे शिवसेनेसाठी अधिक नुकसानीचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT