vijay shivtare
vijay shivtare sarkarnama
पुणे

"मी एकटा जाणार नाही" : पुरंदरमध्ये शिवसेनेला सुरुंग लावण्याचा शिवतारेंचा जाहीर इशारा

सरकारनामा ब्युरो

पुणे : मी मरेपर्यंत ठाकरे कुटुंबावर कधीच टीका करणार नाही. पण, आज शिवसेनेत हे सगळं घडविणारा कर्ताकरविता संजय राऊतच आहे. दोन प्रांतीक पक्ष एकत्र आले तर एकाला फटका बसणार हे गणित त्यांना महिती असताना ही त्यांनी महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांची निष्ठा पवारसाहेबांसोबत की ठाकरे साहेबांसोबत आहे, हेच कळत नाही, अशी टीका शिवसेनेचे नेते व माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे.

शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर माजी मंत्री विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत श्री. शिवतारे यांची एका वृत्तवाहिनीने भूमिका जाणून घेतली. विजय शिवतारे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी घेतलेला निर्णय हे बंड नाही, गद्दारी नसुन ही खुद्दारी आहे. गावागावात जा, कुठेही जा प्रत्येक ठिकाणी माजी मंत्री म्हणून लोक मला म्हणतात, विचारतात बापू तुम्ही तरी समजवा.

आजही आम्ही उद्धव साहेबांचे नेतृत्व मानतो. आदित्य ठाकरे साहेबांनाही तेवढेच मानतो. पण, संजय राऊत या माणसाने शिवसेनेची तारांबळ करून टाकली आहे. अतिहुशार माणसाला मनोविकार होतो. त्यातून त्याला वेगवेगळे भास होतात. तसेच त्यांना महाविकास आघाडी करून व मुख्यमंत्री करण्याचा भास झाला. त्यानंतर गोव्याचा मुख्यमंत्री सेनेचा होणार याचा भास झाला. त्यामुळे ते आदित्य साहेबांना सोबत घेऊन गेले, त्यांना भाषणे वगैरे करायला लावली.

फडणवीस सांगत होते, आमची लढाई शिवसेनेशी नाही. तर शिवसेनेची लढाई नोटाशी आहे. त्यांचे खरेच झाले. शिवसेनेला नोटा एवढी मते मिळाली. हे कोणामुळे झाले संजय राऊतांमुळे झाले आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत होते, शिवसेनेची किती ही अडचण झाली तरी आम्ही काँग्रेसशी युती करणार नाही. शिवसेनेची दुकानदारी बंद करेन पण काँग्रेसशी युती करणार नाही. ज्यावेळी शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला, त्यावेळी माझ्याही मनात आले की हीच योग्य वेळ आहे.

शिंदे साहेब जो विचार घेऊन निघाले आहेत, आपणही त्यांच्यासोबत गेलं पाहिजे, असे आम्ही ठरवले. त्यानुसार आमच्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि निर्णय घेतला. एकनाथ शिंदेंची शिवसेना ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार असलेली खरी शिवसेना आहे. बाळासाहेबांनी त्यांच्या अखेरच्या काळात काँग्रेसची पंचसुत्री संपवा, असे आदेश दिले होते. त्यांचा शेवटचा आदेश कोणी पाळत नसेल व त्याला फारकत होत असेल तर ते योग्य नाही.

हिंदुत्वाच्या विचारावर सर्वजण शिंदेसाहेबांसोबत बाहेर पडत आहोत. कारण खरी शिवसेना ही शिंदे साहेबांची दिसते, असे त्यांनी स्पष्ट केले. आता उद्धव ठाकरेंच्या शब्दांला किंमत राहिली नाही का, असे विचारले असता शिवतारे म्हणाले, उद्धव ठाकरे साहेबांच्या शब्दांना प्रचंड किंमत आहे. आदित्य साहेबांशी ही तेवढाच आदर आहे. तेजस बद्दलही तेवढाच आदर आहे. पण शेवटी जनहित महत्वाचे आहे. अडीच वर्षात काय झाले हे सर्वांना माहिती आहे.

अनेक गोष्टींबाबत खूप नाराजी होती. मी ठाकरे कुटुंबावर कधीच टीका करणार नाही. मरेपर्यंत या कुटुंबाबत अपशब्द निघणार नाही. पण, हे सगळे घडवणारा कर्ताकरविता संजय राऊत आहे. दोन प्रांतीक पक्ष एकत्र आले तर एका पक्षाला फटका बसणार हे गणित माहिती असतानाही त्यांनी हे सर्व घडविले. त्यांची निष्ठा पवारसाहेबांसोबत की ठाकरेंसोबत आहे, हेच कळत नाही.

पुन्हा स्वगृही येण्याचा निर्णय होऊ शकतो का, याविषयी शिवतारे म्हणाले, चांगले पॅचअप झाले. चांगला व योग्य निर्णय झाला तर आम्ही एकत्र येण्यास तयार आहोत. राजकारणात काही गोष्टी घडत असतात. मी एकटा जाणार नसून शिंदे गटात माझ्या परिसरातील सर्व पदाधिकारी, आजी, माजी आमदार, नियोजन समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य घेऊन आम्ही जाणार आहोत. पण, या सर्वांना एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करायची आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यामुळे शिंदे गटात पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्याप्रमाणात सहभागी होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT