Sunil Shelke
Sunil Shelke  Sarkarnama
पुणे

Sunil Shelke : भाजपचा आमदार असतो, तर माझ्यामागे तपास यंत्रणा लागल्या नसत्या; सुनील शेळकेंचा टोला

उत्तम कुटे

पिंपरी : विकासकामांना स्थगिती देऊन शिंदे-फडणवीस सरकारने आमच्याशी गद्दारी केली. ती जनतेशी गद्दारी असल्याने ती न करता त्यात राजकारण न आणता ही स्थगिती उठवा, असे आवाहन मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी केले. नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विधानसभेत ते बोलत होते.

मावळातील गुन्हेगारी, अवैध धंदे आणि विकासकामांनी दिलेल्या स्थगितीवर आ.शेळकेंनी हल्लाबोल केला. पोलिसांना सातत्याने सांगूनही आपल्या मतदारसंघात गावागावात अवैध धंदे (हातभट्या) सुरु आहेत. त्याला जबाबदार कोण, कोण त्याला पाठीशी घालतंय, अशी विचारणा त्यांनी केली. हे धंदे व नव्याने तयार झालेल्या कोयता गॅंग यांना आळा घालण्याची मागणी त्यांनी केली.

मावळात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असताना राष्ट्रवादीचा आमदार असल्याने आपल्यामागे तपास यंत्रणा लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. माझ्यासह कुटुंबाच्या व माझ्या व्यवसायाच्याही चौकशा सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले. मी विरोधात बोलतो हा काय गुन्हा आहे का? माझ्यामागे यंत्रणा लावण्यापेक्षा नागरिकांना सुरक्षा द्या, अवैध धंद्यामागे त्या लावा, असे ते म्हणाले.

जर मी भाजपचा आमदार असतो, तर या चौकशा लागल्या असता का, असा सवाल त्यांनी केला. मावळात पाच वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. तिच्या कुटु्ंबाला या सरकारने मदत न दिल्याबद्दल त्यांनी खेद व संतापही व्यक्त केला. मावळात खून, दरोडे वाढत असून युवक व्यसनाधीन होत असताना या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची, असा त्रागा त्यांनी केला. कारण यांच्या ओठात एक आणि पोटात दुसरंच असून त्यांच्याकडून फक्त सुडाचे राजकारण सुरु आहे, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार असताना विकासकामांची गंगा वाहत होती, असा दावा आ. शेळकेंनी यावेळी केला. त्यातूनच माझ्या मतदारसंघासाठी बाराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. पण, शिंदे-फडणवीस या स्थगिती सरकारने त्याला स्थगिती दिली.

हे खरंच जनतेचं सरकार असेल, तर त्यांनी या मंजूर निधीपैकी निम्मा द्यावा, मी त्यांचे आभार मानेन, असे आव्हान आ.शेळकेंनी यावेळी दिले. किमान रस्त्यांसाठी मंजूर झालेले सत्तर, ऐंशी कोटी मिळावेत. जेणेकरून पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे होतील. अन्यथा पावसाळ्यात अपघात होऊन मृत्यू झाले, तर त्याला हे सरकार जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT