Wablewadi Palaksabha
Wablewadi Palaksabha Sarkarnama
पुणे

CEO आयुष प्रसादांचीच चौकशी करा : वाबळेवाडी पालकसभेचा ठराव शिंदे-फडणवीसांना देणार

भरत पचंगे

शिक्रापूर (जि. पुणे) : जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी लोकवर्गणी करूनही शाळेची चौकशी अन बदनामी करण्यात आली. वर्षभरानंतरही चौकशी अपूर्ण आहे, वर्षभरात एकदाही शाळा व पालकांच्या भेटी नाहीत, शाळेचे अनेक उपक्रम बंद आहेत, सुमारे २०० विद्यार्थ्यांना शाळा सोडावी लागली, अशा अनेक गंभीर कारणांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांना जबाबदार धरून त्यांचीच चौकशी करण्यात यावी. तसेच, गेल्या वर्षभरातील त्यांच्या सर्व फोन संभाषणांची तपासण्याची करण्यात यावी, असा ठराव वाबळेवाडी (Wablewadi school) पालकसभेने नुकताच घेतला. हा ठराव थेट मुख्यमंत्री (chief minister) व उपमुख्यमंत्री (deputy chief Minister) यांना पुढील काही दिवसांत मंत्रालयात जाऊन देण्यात येणार आहे. दरम्यान याबाबत आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. (Investigate CEO Ayush Prasad : Wablewadi Palaksabha resolution will be given to Shinde-Fadnavis)

आयुष प्रसाद यांनी १७ जुलै रोजी एका बातमीच्या आधारे शाळेची चौकशी लावत तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांना निलंबित केले होते. वारे यांच्या निलंबनानंतर शाळेतील बहुतांश वैशिष्ठ्यपूर्ण उपक्रम बंद पडल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. अंगणवाडीचे १८० पैकी केवळ ४० विद्यार्थी शाळेत राहिले आहेत, तर २०० विद्यर्थ्यांनी शाळा सोडली आहे. या प्रकरणाबाबत ग्रामस्थांनी आयुष प्रसाद यांची अनेकदा भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विनापरवानगी लोकवर्गणी गोळा केल्याचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला.

वाबळेवाडी शाळेचा राज्यात नावलौकीक असताना आयुष प्रसाद पूर्वी कधीही आले नाही आणि शाळेची चौकशी लावल्यानंतरही ते शिक्रापुरात तीन वेळा येऊनही वाबळेवाडी शाळेत मात्र आले नाहीत. सुमारे २०० विद्यार्थी बाहेर गेल्याने शाळेने त्यांना मार्गदर्शन मागितले. मात्र त्याबाबतही त्यांनी उत्तर दिलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर वाबळेवाडी ग्रामस्थ, पालक यांनी एकत्र येत पालकसभा घेतली. त्यात आयुष प्रसाद यांची चौकशी करण्याची, त्यांचा गेल्या वर्षभरातील सर्व कॉल डिटेल्सची चौकशी करण्याचा ठराव करण्यात आला.

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेशा वाबळे, केंद्रप्रमुख रत्नमाला मोरे, माजी सरपंच केशवराव वाबळे, भगवानराव वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, युवराज मांढरे, विकास मासळकर, अविनाश कदम, अभिजित जोशी, सतीश वाबळे, दत्तात्रय बारगळ, बंडू कुकडे, अंकुश वाबळे, सतीश कोठावळे आदींसह महिला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्षभरानंतरही वारेंची चौकशी अपूर्णच

मुख्याध्यापक वारे यांची चौकशी पूर्ण करुन त्यांना तत्काळ वाबळेवाडीत रुजू करुन घेण्याची ग्वाही देऊन तेरा महिने उलटले तरीही त्यांची चौकशी अपूर्ण ठेवण्यात आयुष प्रसाद यांचाच हात आहे. आम्ही हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पुराव्यांसह कळवून ही चौकशी लावण्यास भाग पाडणार आहे, असे सतीश वाबळे यांनी सांगितले.

पुन्हा गोळा केली लोकवर्गणी

स्वातंत्र्यदिनी १ लाख ३९ हजार रुपयांची लोकवर्गणी काढणाऱ्या वाबळेवाडीकरांनी पुन्हा २० हजारांची लोकवर्गणी गोळा केली. त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होऊनही आयुष प्रसाद यांनी कारवाई का केली नाही, याचा जबाब आम्ही आता लेखी स्वरुपात विचारणार आहोत, असे माजी सरपंच केशवराव वाबळे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT