Tanisha Bhise death : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दहा लाख रुपये भरण्याचा अट्टहास गर्भवती महिलेच्या जिवावर बेतल्याचा आरोप होत आहे. भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असणाऱ्या सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना सातव्या महिन्यातच त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले असताना रुग्णालयाने दहा लाख रुपयांसाठी उपचार न करण्याचा निष्ठुरपणा दाखवला.
त्यामुळे तनिषा यांचा मृत्यू झाला, यावरून राज्यभरात डॉक्टरांच्या रुग्णांप्रति असणाऱ्या कर्तव्याबद्दल उलटसुलट चर्चा होत आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुख्यमंत्री कार्यालयावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री कार्यालयाला देखील कुणीही घाबरत नाही, असा टोला लगावला.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रवक्ते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यामांशी बोलताना वैद्यकीय क्षेत्राच्या सामाजिक बांधिलकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बदलत्या अर्थकारणामुळे वैद्यकीय क्षेत्राचे व्यापारीकरण होत असल्याचा घणाघात केला.
'वैद्यकीय ‘सेवा’ असे आपण म्हणतो, रुग्णांचा जीव वाचवणे हे पुण्य मिळवण्याचे काम आहे, असेही मानले जाते. तरी आर्थिक तोटा सहन करून काम करा असे कोणीही म्हणणार नाही. परंतु वैद्यकीय क्षेत्र हा काही चोखपणे करण्याचा व्यवहार नाही, तर यामध्ये सामाजिक जबाबदारी निभावणे अभिप्रेत असते. मात्र हीच बाब डॉक्टर्स आता विसरत चाललेत. फक्त आर्थिक लाभाच्या दृष्टिकोनातून रुग्णालय चालवताना सामाजिक दृष्टिकोनाचा अभाव दिसतो', असे आमदार आव्हाड यांनी नमूद केले.
'याच नव्हे तर अनेक रुग्णालयांत आपल्याला तिटकारा यावा, असे प्रकार सर्रास होताना दिसतात. निव्वळ एक रुपया भाडेपट्टीने भूखंड वापरताना व्यवस्थेची बूज राखणे या रुग्णालयाला महत्त्वाचे वाटले नाही. परिस्थिती बदलली त्यासोबत लोक एवढे बदलले, की व्यवस्थेचा धाक देखील त्यांना राहिलेला नाही', असा हल्ला आमदार आव्हाड यांनी चढवला.
थेट मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला म्हणजे तुम्ही लगेच कामाला लागले पाहिजे, असे त्यांना बिलकुल वाटत नाही. अर्थात व्यवस्थेला घाबरणेही अशांनी सोडले आहे की काय? असा सवाल देखील आव्हाड यांनी उपस्थित केला. वास्तविक रुग्णालयात उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने फोन केला तरी ते अपेक्षित नाहीच. फोन आला म्हणून घाबरून काम करणेही योग्य नाही. त्याऐवजी, डॉक्टर्स आणि रुग्णालयांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून काम करणे अतिशय आवश्यक आहे, अशी अपेक्षा आव्हाड यांनी व्यक्त केली.
याशिवाय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाबतीत चौकशी हे थोतांड असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. अहवाल येत-जात असतात, डॉक्टर अहवाल मॅनेज करू शकतात. त्यामुळे सर्व निर्दोष ठरतील अशी शंका आव्हाड यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.