Shailesh tilak
Shailesh tilak  Sarkarnama
पुणे

Kasba By Election : ...तर कसब्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक! रासनेंच्या पराभवानंतर शैलेश टिळकांचं मोठं विधान

सरकारनामा ब्यूरो

Pune News : कसबा पोटनिवडणुकीत जायंट किलर ठरत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंवर दणदणीत विजय मिळवला. यानंतर विरोधीपक्षाच्या नेतेमंडळींकडून धंगेकर यांच्या विजयावर प्रतिकिया देतानाच भाजपची कानउघडणी देखील केली जात आहे. मात्र याचवेळी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी कसबा पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर मोठं विधान करतानाच कसब्यातून पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचंही जाहीर केलं आहे.

शैलेश टिळक(Shailesh Tilak) यांनी भाजपच्या पराभवावर भाष्य केलं आहे. टिळक म्हणाले, कसब्यात गेल्या ३० ते ३५ वर्षांमध्ये भाजपची पक्षसंघटना घट्टपणे बांधली गेली आहे. तरीही कसब्यात भाजपचा पराभव झाला. या पराभवाची कारणं शोधून काढली पाहिजेत. त्यासाठी मतदारांपर्यंत जाऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत. टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी मिळाल्यास भाजपला कसब्यात विजय मिळाला असता का, हे आत्ताच सांगता येणार नाही. त्यासाठी कसब्याच्या कोणत्या भागात किती मतदान झाले, हे तपशीलवार पाहिले पाहिजे.

रवींद्र धंगेकर यांचा ११ हजारांचं मताधिक्य कसं मिळालं, भाजपला कुठल्या प्रभागात कमी मतं पडली, हे तपासले पाहिजे. पण सदाशिव पेठ, नारायण पेठेचा परिसर असणाऱ्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये भाजपच्या हेमंत रासने यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. या सगळ्याला ब्राह्मण समाजाची नाराजी कारणीभूत आहे का,याचाही शोध घेतला पाहिजे असंही शैलेश टिळक असं विधान करतानाच भाजपकडून त्यांची समजूत काढण्यात आली होती.

कसब्यातील हा पराभव खरोखरच धक्कादायक असल्याचे म्हटलं आहे. हा पराभव पचवणं आमच्यासाठी खूप अवघड असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, आता कसब्यातील पराभवानंतर शैलेश टिळक यांनी भाजपला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचंही मत व्यक्त केले आहे.

यावेळी शैलेश टिळक यांनी भाजपनं पुन्हा संधी दिल्यास कसब्यातून निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. कसब्यातील आगामी निवडणुकीत लढण्यासाठी मी १०० टक्के इच्छूक आहे. आपल्याला ही जागा पुन्हा मिळवायची आहे. कसब्यातून मला किंवा माझ्या बाबांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही इच्छूक आहोत. त्यासाठी भाजपला पुन्हा पहिल्यापासून कामाला लागले पाहिजे असे टिळक यांनी सांगितलं आहे.

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबातच ही उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता होती. यात शैलेश टिळक किंवा कुणाल टिळक यांच्यापैकीच कुणाला तरी उमेदवारी दिली जाईल अशी स्थिती होती. मात्र त्यावेळी भाजपकडून त्यांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर टिळक कुटुंबीय नाराज असल्याची चर्चा होती. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या दिग्गज नेतेमंडळींना टिळक कुटुंबियांची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरावे लागले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT