Supriya Sule
Supriya Sule Sarkarnama
पुणे

बदला घेतल्याची भाषा दुर्दैवी : सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर नाव न घेता टीका

मिलिंद संगई

बारामती : राज्याच्या राजकारणात सध्या जे सुरू आहे, ते दुर्देवी आहे. ज्येष्ठ नेत्यांनी बदला घेतल्याची भाषा वापरणे योग्य नाही. आज अनिल देशमुख, नबाब मलिक यांच्यासोबत जे काही सुरु आहे, ते अस्वस्थ करणारे आहे, अशी भावना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केली. सुळे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. (Language of revenge is unfortunate : Supriya Sule's criticism of Fadnavis)

दरम्यान, या पूर्वीही राजकीय कटुता होती. पण सध्या जे सुरु आहे, ते मला अस्वस्थ करणारे आहे. देशमुख, मलिक, राऊत या कुटुंबीयांना कोणत्या स्थितीतून जावे लागत आहे, याची मला जाणीव आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

बारामतीत माध्यमांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, ज्या संस्कृतीत मी वाढले, ती ही संस्कृती नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा आपण जपतो. त्यात विरोधक हा वैचारिक विरोध करतो, बदल्याची भाषा त्यात नसते. बदला घेतल्याची भाषा मी पहिल्यांदा ऐकली, हे अतिशय दुदैवी आहे.

ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत ते पाहता विरोधकांचे ते पुढील टार्गेट असावेत. महाराष्ट्राने इतके गलिच्छ राजकारण यापूर्वी पाहिले नव्हते, असेही त्या म्हणाल्या. खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्या अशी मागणी केली आहे, यावर त्यांनी या मागणीला आमचा पाठींबा असेल, असे स्पष्ट केले.

राहूल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या टीकेबद्दल सुरु असलेल्या गदोराळासंबंधी त्या म्हणाल्या की, विरोधकांकडे बोलण्यासाठी सध्या काहीही उरलेले नाही. त्यामुळे ते जुनेच विषय उगाळून काढत आहेत. या विषयावर यापूर्वी अनेकदा चर्चा झाली आहे.

संजय राऊत यांचा जामिन रद्द व्हावा अशी मागणी ईडीने केली आहे. त्याबाबत सुळे म्हणाल्या की, जोपर्यंत उच्च न्यायालयाकडून ऑर्डर येत नाही; तोपर्यंत त्यावर बोलता येणार नाही. त्यांची मागील निकालपत्र मी पूर्णपणे वाचल्यावर त्यात त्यांच्यावर झालेली कारवाई पूर्णतः चुकीची असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे फारशी चिंता करावी असे मला वाटत नाही, असे त्या म्हणाल्या.

हर हर महादेव चित्रपटासंबंधी त्या म्हणाल्या की, एखादा सिनेमा इतिहासावर असेल. तर किती लिबर्टी घ्यावी, हे पाहिले पाहिजे. हा विषय आता राजकीय नसून सामाजिक झाला आहे. छत्रपतींचा कोणी चुकीचा इतिहास दाखवत असेल तर त्याचा जाहीर निषेध झालाच पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT