Dilip Mohite
Dilip Mohite sarkarnama
पुणे

राष्ट्रवादीचे आमदार मोहितेंची नाराजी कायम; मतदान काही तासांवर तरीही मुंबईत पोचले नाहीत!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीचे (Legislative Council Election) मतदान अवघ्या काही तासांवर आलेले असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खेडचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांची नाराजी कायम आहे. पक्षाचे इतर सर्व आमदार मुंबईत पोहोचलेले असताना मोहिते मात्र अजूनही पक्षाच्या आमदारांसोबत दाखल झालेले नाहीत, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मोहिते कोणता पवित्रा घेणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नाराज मोहिते उद्या (ता. २० जून) मुंबईत जाणार आहेत, असे आमदार मोहिते यांनी सांगितले. (Legislative Council Election: NCP MLA Dilip Mohite's displeasure remains)

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंची नाराजी अजूनही कायम आहे. आमदार मोहिते हे अद्याप मुंबईत पोहोचलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार मुंबईतील हॉटेल ट्रायडेंटमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, आमदार मोहिते मात्र अद्याप मुंबईत पोचलेले नाहीत. कारण पक्ष नेतृत्वाने त्यांना दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झाली नसल्याने त्यांची नाराजी अद्याप कायम आहे, त्यामुळेच ते अजून मुंबईत आलेला नाहीत, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोहिते यांच्या घरी भेट दिली होती. त्यानंतरही त्यांची नाराजी कायम असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी आमदार मोहिते यांनी माध्यमांसमोर येत आपल्या मतदारसंघातील कामे होत नसल्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांचा रोख अर्थातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडे होता. आपली कामे होत नाहीत, गेली दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही खेड तालुक्यातील प्रशासकीय इमारत, पोलिस ठाणे आणि पंचायत समितीची इमारतीचे काम होत नसल्याची खंत व्यक्त केली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत आमदार दिलीप मोहिते यांच्याशी चर्चा केली होती. पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यास तयार झाले होते. त्यानंतर मोहिते यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान केले हेाते.

त्यावेळी काय म्हणाले होते दिलीप मोहिते?

गेल्या दोन ते अडीच वर्षांत मंत्रालयात आल्यानंतर फक्त अजित पवारच असायचे. सगळ्या पक्षाचे आमदार त्यांना भेटून समस्या सांगायचे. ते सर्वांना मदत करण्याचे काम करायचे. कदाचित अजित पवार नसते, तर हे महाविकास आघाडीचे सरकारसुद्धा टिकले नसतं. महाविकास आघाडीचे सरकार खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच चालवले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आमच्यासाख्या आमदारांचा ते विचार करतात, तर बाकीच्यांनी का करू नये. गेली एक वर्षभर मंत्रालयात आमच्या खेड तालुक्यातील विकास कामांसदर्भातील फायली पडून आहेत. त्यात माझा काही दोष नाही, त्या काही माझ्या वैयक्तीक कामाच्या नाहीत, असे आमदार दिलीप मोहिते यांनी म्हटले हेाते.

खेड तालुक्यातील पंचायत समिती, पोलिस ठाणे, प्रशासकीय इमारतींच्या संदर्भातील त्या फायली आहेत. या सर्व गोष्टी संपूर्ण खेड तालुक्याच्या आहेत आणि मी तालुक्यासाठी मागतोय, त्याला आडकाठी आणण्याचे काही कारण नाही. असले राजकारण कोणी करू नये. आमचं राजकारणच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अवलंबून आहे, त्यामुळे त्यांनी सांगितले येथे बटण दाब की आम्ही ते बटन दाबणार. त्यांना मतदान कर, असे म्हटलं की आम्ही करणार आहे. त्यांनीसुद्धा माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी ऐकले नाही, त्याचा राग माझ्या मनामध्ये आहे, असे मोहिते यांनी मतदानापूर्वी माध्यमांशी बोलताना म्हटले हेाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT