Raj Thackeray
Raj Thackeray sarkarnama
पुणे

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे जाणार हे मला आधीच माहीत होते!

Amol Jaybhaye

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार हे मी नोव्हेंबरपासून सांगत होतो. निवडणूक आली की ती चढायला लागते. ती स्पर्श करते. वातावरणात मला निवडणूक दिसत नव्हती. आमच्या ओबीसी समाजाचे कारण पुढे केले गेले. त्यांची मोजणी करायची वगैरे कारण दिले. या निवडणुका होऊ नयेत आणि प्रशासक नेमावा, असेच सरकारला वाटत आहे. सरकारही हातामध्ये आणि प्रशासक यांचाच सारे आम्हीच पाहणार, असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज सोळावा वर्धापनदिन आहे. हा विर्धापनदिन पहिल्यांदाच मुंबईबाहेर पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंदिरात झाला. यावेळी राज ठाकरे बोलत होते. राज यांनी यावेळी राज्याच्या राजकारणात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांवर तोफ डागली. या कार्यक्रमाला मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) अमित ठाकरे (Amit Thackeray), नितीन सरदेसाई, शर्मिला ठाकरे, यांच्यासह राज्यातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत निवडणुकांच्या तारखा ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारला मिळावे यासाठी विधेयक मंजूर केले. त्यामुळे राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर पडणार असल्याचे सांगितले जात आहे. या निवडणुकांवर भाष्य करताना राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, मला आधीच माहित होते की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढलल्या जाणार आहेत. ओबीसी आरक्षणाचे कारण पुढे केले असले तरी मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली नाही. हे निवडणूक पुढे ढकलण्याचे खरे कारण आहे, असे ठाकरे म्हणाले. त्यामुळे या निवडणुका आता दिवाळीनंतर होतील, असा दावाही त्यांनी केला.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, 21 मार्च रोजी शिवजयंती आहे. आधी तारखेने साजरी झाली. आता तिथीने आहे. आपल्या शिवछत्रपतींची जयंती आहे. आपली ओळखच त्यांच्यामुळे आहे. आम्ही कोण आहोत? आम्ही मराठी भाषा बोलणारे आहोत म्हणून मराठी आहोत. शिवाजी नावाचा विचार असलेल्या भूमीत आम्ही राहतो. तारखेने करावी की तिथीने करावी? त्यांची जयंती 365 दिवस करायला हवी. ज्याला वाटेल त्यांनी त्या दिवशी करी. तिथीने का करावी? कारण आपण आपले सगळे सण हे तिथीने करतो. प्रत्येक सण हा तिथीनुसार साजरा होता. हा आपल्या राजाचा जन्मदिवस हा सण आहे. हा महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा सण आहे. तो सण म्हणून तिथीने साजरा करायचा आहे. त्यामुळे 21 मार्च रोजी हा सण साजरा करा, असे त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT