Pune MNS Protest Sararnama
पुणे

Pune MNS Protest : मंगलाष्टका म्हणत मनसेनं लावलं उपायुक्तांच्या दालनातच लग्न; काय आहे कारण?

Sudesh Mitkar

Pune Political News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष नागरी प्रश्नावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या नागरी प्रश्नांच्या माध्यमातून जनतेत जाण्याचा प्रयत्न नेतेमंडळी करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मनसेनेही उचल खाल्ली आहे.

आता मनसेकडून त्यांच्या स्टाईलने खळ्-खट्याक आंदोलन करण्यात येत आहे. आता मात्र मनसे पदाधिकाऱ्यांना हातात अंतरपाट घेत मंगलाष्टका म्हणत थेट पुणे उपायुक्तांच्या दालनात लग्न लावून अनोखे आंदोलन केले.

मनसेने पुण्यातील जागा लढवण्याचे स्पष्ट केले आहे. त्यासाठी पक्षातील पदाधिकारी कामाला लागले आहेत. मनसे पक्ष त्यांच्या विशिष्ट पद्धतीच्या आंदोलनामुळे सातत्याने चर्चेत राहिला आहे. पुण्यात देखील मनसेकडून अशाच प्रकारचे आंदोलन करण्यात आले आहे. ते आंदोलन सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट उपायुक्तांच्या दालनामध्ये जाऊन मंगलाष्टका म्हणत लग्न लावून अनोखे आंदोलन केले.

शिवाजीनगर मतदारसंघातील पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सात मधील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक हॉल हा नागरिकांना विविध कार्यक्रमास उपलब्ध करून दिला जातो. आत्ता हा हॉल महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. या निर्णयाला मात्र स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे. हा हॉल सर्वसामान्य लोकांसाठी विविध कार्यासाठी उपलब्ध करून देण्याचा आग्रह लोकांनी केला आहे.

नागरिकांची या मागणीचा धागा पकडून मनसे पदाधिकाऱ्यांनी थेट उपायुक्तांचे कार्यलय गाठले. तेथे संबंधित हॉल लग्न, तसेच विविध कार्यक्रमांसाठी लोकांना उपलब्ध करावा, अशी मागणी केली. या मागणीसाठी मनसेच्या वतीने प्रतिकात्मक स्वरूपाचे आंदोलन शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयत करण्यात आले.

यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उपयुक्त्याच्या दालनात प्रतिकात्मक स्वरूपात लग्न लावले. नवरा-नवरीला बाशिंग बांधून, तसेच अंतरपाट धरून मंगलाष्टकाही म्हणण्यात आल्या. हे आंदोलन सर्व अधिकाऱ्यांसमोर करण्यात आले.

याबाबत मनसे पदाधिकारी रणजीत शिरोळे म्हणाले, महापालिकेकडून शिवाजीनगर येथील या सांस्कृतिक भवनाचे रूपांतरण आरोग्य कोठडीत करण्याचा घाट घातला जात आहे. कोणाला तरी फायदा होण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

स्थानिक नागरिकांच्या दृष्टिकोनातून हा हॉल फार महत्त्वाचा आहे. या ठिकाणी लग्न, वाढदिवस, बारसे आदी कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. हा हॉल बंद झाल्यास नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित या सगळ्या गोष्टी थांबव्यात, अशी मागणीही रणजित शिरोळे यांनी मनसेच्या आणि नागरिकांच्या वतीने केली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT