Ajit Gavhane and Ajit Pawar
Ajit Gavhane and Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

शंभर नगरसेवक निवडून आणण्याचा गव्हाणेंनी दिला अजितदादांना शब्द!

उत्तम कुटे: सरकारनामा ब्युरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची (PCMC) जबाबदारी पक्षाने देताच दुसऱ्याच दिवशी (ता.३) पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन अजित पवार (Ajit Pawar) यांनी भूमिपूजन आणि उद्घांटनाचा धडाका केला. त्यानिमित्त चिंचवडमध्ये आयोजित पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात शंभर नगरसेवक निवडून द्या, शहराचे सर्व प्रश्न सोडवतो, असे आश्वासन अजितदादांनी दिले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शंभर नगरसेवक निवडून आणण्याचा जाहीर शब्द अजितदादांना दिला आहे. (PCMC Election News Updates)

भाजपने आधीच पिंपरी-चिंचवडमध्ये शंभर प्लसचा नारा दिला आहे. त्यादृष्टीने भाजपकडून जय्यत तयारी सुरू आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीने शंभर नगरसेवक निवडून आणण्याची घोषणा केली. त्यामुळे या दोन्ही माजी सताधाऱ्यांतील कोण पुन्हा २०२२ ला सत्तेत येतो, याकडे लक्ष लागले आहे. महापालिकेची निवडणूक सप्टेंबर अखेरीस अथवा ऑक्टोबरच्या सुरवातीस होण्याची शक्यता असल्याने त्यावेळी प्रचाराचा जोरदार धुरळा उडणार आहे.

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात राष्ट्रवादीचा मोठा कार्यक्रम झाला. त्यासाठी शहरात लावलेले होर्डिंग्ज लक्षवेधी ठरले. शहर पातळीवरील पक्षातील एकी त्यातून दाखवण्यात आली. नव्या शहर कार्यकारिणीच्या पदवाटपाच्या या कार्यक्रमात गव्हाणे यांनी आधीच्या सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला. गेल्या पाच वर्षातील लाचखोरी, खंडणीखोरी आणि भ्रष्टाचारामुळे शहराची अधोगती झाली. स्मार्ट सिटीच्या नावाखाली भाजप नेत्यांनी शहर लुटले,अशी तोफ त्यांनी डागली.

सत्तेचा गैरवापर करत भाजपच्या नेत्यांनी प्रत्येक कामांत गैरव्यवहार केला. त्यामुळे या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे. तसेच गतवेळी भाजप नेत्यांनी शहरवासियांना भूलथापा मारल्या आणि खोटी आश्वासने दिली. सत्ता आल्यानंतर दिलेल्या आश्वासनांपैकी एकही ते पूर्ण करू शकले नाहीत.त्यामुळे शहराचा पुन्हा विकास राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच होऊ शकतो याची खात्री जनेतला पटल्याने या वेळी राष्ट्रवादीचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रभाग रचना व आरक्षण सोडतही पक्षाला अनुकूल झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी नेत्यांच्या सांगण्यावरून तिकिट दिले जाणार नसून ते काम व निवडून येण्याची क्षमता विचारात घेऊन दिले जाईल. जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांसह तरुणांना अधिक संधी दिली जाणार आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘पिंपरी चिंचवडच्या विकासाला हवी, पुन्हा वादळी गती, आपली राष्ट्रवादी’ हे ब्रीदवाक्य घेऊन या निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

नवीन अध्यक्ष गव्हाणेंमुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून, सगळे एकजुटीने कामाला लागले असल्याची पावती शहर समन्वयक तथा प्रवक्ते योगेश बहल यांनी दिली. त्यांनीही भाजपवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, भाजपने पाच वर्षांत केवळ आणि केवळ भ्रष्टाचाराचे राजकारण केलं. बहुमताच्या जोरावर रेटून कारभार केला, चुकीची कामे केली. कुत्र्यांच्या नसबंदीतही भ्रष्टाचार करण्याचा विक्रम केला. कोरोना काळात भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी महापालिकेची लूट केली. शिक्षण मंडळ, आरोग्य, वैद्यकीय विभाग, स्मार्ट सिटी सेंटरसारख्या प्रत्येक प्रकल्पात भ्रष्टाचार केला. त्यामुळे या भ्रष्टाचाऱ्यांना शहरातील जनता यावेळी थारा देणार नसून राष्ट्रवादीचा विजय निश्चित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT