Shrirang Barne Latest News
Shrirang Barne Latest News  Sarkarnama
पुणे

मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी फक्त दोनच खासदारांचा होता आग्रह; बारणेंचा गौप्यस्फोट

विष्णू सानप

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेमध्ये केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) कोसळलं आणि शिंदे यांनी 40 बंडखोर आमदार आणि भाजपच्या (BJP) समर्थनाने राज्यात नवं सरकार स्थापन केलं आहे. मात्र, शिंदे यांना शिवसेनेला आता राष्ट्रीय पातळीवर देखील धक्का दिला असून 12 खासदारांना आपल्या गळाला लावले आहे. यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांचा देखील सहभाग आहे.

दरम्यान बारणे हे शिंदे गटात गेल्यानंतर ते प्रथमच आपल्या मतदारसंघात आले होते. यावेळी त्यांनी 'सरकारनामा'ला खास मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये अनेक गुपित उलगडली आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासंदर्भात 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत शिवसेना खासदारांची बैठक झाली होती. यामध्ये किती आमदारांनी मुर्मू यांना पाठिंबा दिला होता याबाबतचा खुलासा बारणे यांनी मुलाखती दरम्यान केला आहे.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवार मुर्मू यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाठिंबा जाहीर केल्यावरही असं काय घडलं होत की तुम्ही 12 खासदारांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असा प्रश्न 'सरकारनामा' प्रतिनिधींनी खासदार बारणे यांना विचारला. यावर बोलतांना बारणे म्हणाले की, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये कुणाला पाठिंबा द्यावा यासाठीच्या बैठकीमध्ये मुर्मू यांना पाठिंबा द्यावा असा आग्रह आणि भूमिका फक्त शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि राजेंद्र गावित या दोनच खासदारांनी पक्षप्रमुख ठाकरे यांच्यापुढे मांडली होती. बाकी सर्वांनी ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. अशी भूमिका मांडली होती, असा दावा केला आहे. मात्र सुरू असलेल्या परिस्थितीवर आपल्याला मात करायची असेल तर भारतीय जनता पार्टी सोबत आपण गेलं पाहिजे, अशी भूमिका सर्व खासदारांनी ठाकरे यांच्यापुढे मांडल्याचे बारणे यांनी स्पष्ट केले.

बारणे म्हणाले, या सगळ्या घडामोडीमध्ये मी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत होतो. मात्र ज्यावेळी खासदारांची बैठक झाली त्यावेळी मी ठाकरे यांना सांगितलं की, या परिस्थितीतून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल आणि भाजप सोबत जायला पाहिजे. तसेच यासाठी सर्वांशी चर्चा केली पाहिजे. मात्र ते राष्ट्रवादी आणि आघाडीतून बाहेर पडायला तयार नसल्याने मतदारसंघ आणि सर्व विचार करून मी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आणि मुलाखती दरम्यान बारणेंनी यांनी अनेक गुपित उलगडली.

दरम्यान, एनडीएच्या उमेदवार द्रोपती मुर्मू या आदिवासी समाजातून येत असल्याने त्यांना देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होण्याचा मान मिळणार असल्याने आणि काही खासदारांनी त्यांना पाठिंबा द्यावा यासाठी आग्रह केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या या मागणीचा विचार करून मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता.

त्यावेळी आता सुरू असलेलं राजकारण बघता मी पाठिंबा द्यायला नको मात्र, मी कोत्या मनाचा नाही, अशी भाजपवर टीकही त्यांनी केली होती. मात्र यानंतर शिवसेनेच्या 12 खासदारांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे सर्वांना धक्का बसला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT