Balasaheb Taware and NCP Leader
Balasaheb Taware and NCP Leader Sarkarnama
पुणे

स्वतःचा मोठेपणा वाढविण्यासाठी विरोधक अजित पवारांवर बोलतात : बाळासाहेब तावरेंचा टोला

कल्याण पाचांगणे

माळेगाव (जि. पुणे) : बारामती (Baramati) तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र १५ गावांचे तुटपुंजे असताना कारखान्याचे विस्तारीकण झाले. त्यामुळे सोमेश्वर काखान्याच्या हद्दीतील १० गावे ‘माळेगाव’ला जोडण्याचा नाइलाज होता. राज्यात सत्तांतर झाले आणि सरकारच्या दबावापोटी ‘माळेगाव’चा गावे घेण्याचा ठराव साखर आयुक्तांनी फेटाळला, ही वस्तुस्थिती आहे. पण, अजित पवारांचा (Ajit Pawar) या विषयाशी संबंध जोडून स्वतःचा मोठेपणा वाढविण्याचा केविलपणा प्रयत्न रंजन तावरे व चंद्रराव तावरे करतात, अशा शब्दांत कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे (Balasheb Taware) यांनी ‘विरोधकां’चा समाचार घेतला. (Opponents talk about Ajit Pawar to increase their own greatness : Balasaheb Taware)

दरम्यान, तावरे यांनी साखर विक्रीसंदर्भात केलेल्या आरोपालाही अध्यक्ष तावरे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, ७ ऑक्टोबरचा साखरेचा सौदा ३४८० प्रतिक्विंटल झाला. त्या दिवशीचा हा दर महाराष्ट्रात सर्वाधिक माळेगावला मिळाला. यावेळी उपाध्यक्ष सागर जाधव, अनिल तावरे, तानाजी कोकरे, योगेश जगताप, दत्तात्रेय येळे, स्वप्नील जगताप, मदनराव देवकाते, पोपटराव बुरूंगले, तानाजी देवकाते, बन्शीलाल आटोळे, मंगेश जगताप, राजेंद्र ढवाण आदी उपस्थित होते.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विरोधी संचालक चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी सोमेश्वर कारखान्याची १० गावे जोडणे, कमी दराची साखर विक्री, क्षएफआरपी आदी मुद्द्यावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सत्ताधारी संचालक मंडळाला लक्ष्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष बाळासाहेब तावरे पत्रकारांशी बोलत होते.

रंजन तावरे व चंद्रराव तावरे यांनी सत्तेवर येताच २०१५ मध्ये दहा लाख क्विंटल साखर कवडीमोल किमतीत विकली होती, याकडे लक्ष वेधत अध्यक्ष तावरे म्हणाले की, साखरेचे दर दिवसाला बदलतात. सात ऑक्टोबरचा साखरेचा सौदा ३४८० प्रतिक्विंटल झाला. त्या दिवशीचा दर महाराष्ट्रात सर्वाधिक माळेगाव कारखान्याला मिळाला. त्या बैठकीला विरोधी संचालक रंजन तावरेहेही होते. त्यामुळे सभासदांचे नुकसान केले; म्हणून ओरडणाऱ्या दुतोंडी विरोधकांनी २०१५ मध्ये १० लाख क्विंटल साखर कवडीमोल किमतीत विकली होती. त्या व्यवहारात ४० ते ४५ कोटींपेक्षा अधिक रकमेचे नुकसान झाले होते. विशेषतः एफआरपीही त्यांच्या काळात कशी व कधी दिली, हेही सभासदांना माहिती आहे. त्यावर मात्र काहीही न बोलता विरोधक संचालकांच्या बैठकीत तोंड लपवतात.

माळेगाव कारखान्याने ४५ कोटी रुपयांचे वाटप करूनही ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा कमी आली, असे विचारले असता अध्यक्ष तावरे म्हणाले, ‘माळेगावसह सर्वच कारखान्यांमध्ये यंदा ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा कमी आली आहे. त्या तुलनेत माळेगावची उपलब्ध वाहतूक यंत्रणा चांगली काम करीत असून प्रतिदिनी ९ हजार टनाने कारखान्याचे गाळप होत आहे. राहिला प्रश्न न आलेल्या तोडणी यंत्रणेचा. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाईची प्रक्रिया राबविली जात आहे. संबंधितांच्या सातबाऱ्यांवर वसूल पात्र रकमेचा बोजा चढविण्याचे काम सुरू आहे, असेही तावरे यांनी स्पष्ट केले.

उसदराबाबत ‘माळेगाव’चा नाद करू नका!

माळेगावच्या संचालक मंडळाने अजितदादांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षांत ऊस गळीत असो, अथवा उपपदार्थ निर्मिती प्रकल्पामध्ये उत्पन्न मिळविण्याच्या बाबतीत नेत्रदिपक कामगिरी केली आहे. परिणामी माळेगावने एफआरपीपेक्षा अधिकचा दर दिला. याचा विचार करता सत्ताधारी संचालक मंडळाने तीन वर्षांतच सभासदांना विरोधकांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीच्या तुलनेत ४४१ रुपये अधिकचे दिले आहेत. मेडिक्लेमचा १६ कोटींचा फायदा दिला, त्यामुळे ऊसदाराच्या बाबतीत माळेगावचा नाद करू नका, असाही सणसणीत टोला अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी विरोधकांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT