पुणे

भाजप, मोदी आजही जवाहरलाल नेहरुंवर टीका का करतात ? ; आमदार परिणय फुके म्हणाले..

Mangesh Mahale

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप सरकार सातत्यानं जवाहरलाल नेहरूंवर टीका का करते हा प्रश्न राजकारणात नेहमीचं चर्चिला जातो. पाच दशकांपूर्वी पंतप्रधान राहिलेल्या नेहरुंमुळे वर्तमानातल्या राजकारणावर काय परिणाम होतो, हा कुतुहलाचा विषय. चुका झाकण्यासाठी भाजप हा इतिहासातल्या नेहरुंकडे बोट का दाखवतो आणि स्वत:ची सुटका करुन घेतो, असा आरोप भाजपवर केला जातो. याला आमदार परिणय फुके (parinya phuke) यांनी उत्तर दिलयं. ते सरकारनामा ओपन माईक चॅलेंज (Sarkarnama Open Mic Challenge) या कार्यक्रमात बोलत होते.

सरकारनामा ओपन माईक चॅलेंज या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी सहभाग घेतला होता.'सरकारनामा हिट वेव्ह,' 'सरकारनामा फेस ऑफ',अशा रंगतदार कार्यक्रमात उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel), काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) व भाजपचे आमदार परिणय फुके (parinya phuke) यावेळी उपस्थित होते. यावेळी फुके यांना लोकप्रतिनिधींनी काही तिखट प्रश्न विचारले.

"भाजप हा जगातली सर्वात मोठा पक्ष, भारतात निवडणुका जिंकल्या आहेत, आता भारताच्या बाहेरपण निवडणुका लढण्याचा विचार केला आहे का?" असा पण खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला. त्यावर फुके म्हणाले,"एक दिवस भाजपची एवढी ताकद होईल की जगातील कोणतीही निवडणूक ते प्रभावीत करु शकणार. अमेरिकेचे माजी अध्यक्षही निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मदतीसाठी भारतात आले होते. ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे," "२०१४नंतर या देशातील भष्ट्राचार बंद झाले. एकही गैरव्यवहार बाहेर आला नाही, हे या देशासाठी 'अच्छे दिन' आहे," असे एका प्रश्नाला उत्तर देताना फुके यांनी सांगितले.

"भाजपा असा कुठला एक विचार आहे जो देशाला पुढे नेऊ शकतो आणि एक असा विचार जो देशाला शंभर वर्ष मागे नेऊ शकतो," असा प्रश्न आदिती तटकरे यांनी परिणय फुके यांना विचारला. त्यावर फुके म्हणाले, "जगात भारताला नंबर वन करण्याची क्षमता असणार भाजप हा एकमेव पक्ष आहे. देशाला मागे नेण्याचा भाजपचा कधीच विचार नाही. भाजपचे सर्वच विचार हे देशाच्या विकासासाठीच आहे. आमचं ब्रीदवाक्यच आहे. 'पहिले देश, नंतर पक्ष, नंतर मी' भाजपच्या सत्तेत देश जगात नंबर वन होईल,"

"२०१४ पूर्वी या देशात काहीच नव्हतं. आपण सध्या जे अनुभवतोयं ते २०१४ नंतरच सगळं आलेलं आहे असा भ्रम लोकसभेत आपले तीनशेपेक्षा अधिक खासदार करीत असतात. एकवेळ अशी येईल की भाजप म्हणणार की आमच्यामुळे हा चंद्र आणि सुर्य उगवत आहे?" असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी फुके यांना केला. फुके म्हणाले,"या प्रश्नांमुळे तुम्ही (एमआयएम) ही भाजपची बी टीम आहे हा समज दूर केला आहे. आमच्या कुठलाही नेत्याचे असे विचार नाही. आमच्यावर असे संस्कार नाही,"

"जगातील शक्तीशाली पक्ष असतानाही आपल्याला प्रत्येक प्रश्नांच्या वेळी पंडित नेहरुंची का आठवण येते," असा प्रश्न धीरज देशमुख यांनी केला.फुके म्हणाले, "काँग्रेस आजही स्वतःच्या पक्षाच्या अध्यक्षांच्या नावानं मते मागत नाही. ते आजही नेहरुंजींच्या भरोशावर मत मागतात, काँग्रेस त्यांच्या नावावर मते मागतात, म्हणून आम्हीही या तुलनेत काँग्रेसवर टीका करण्यासाठी नेहरुंचेच नाव वापरतो,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT