Bachchu Kadu, Sambhajiraje Chhatrapati, Raju Shetty,manoj Jarange Patil, Raj Thackeray, Prakash Ambedkar Sarkarnama
पुणे

Parivartan Mahashakti News : 'परिवर्तन महाशक्ती' आघाडीचा मोठा निर्णय; तब्बल 'एवढ्या' जागा लढणार

Deepak Kulkarni

Pune News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यातच महायुती आणि महाविकास आघाडीशी सूत न जुळलेल्या छोट्या छोट्या घटक पक्षांनी आपली एकत्र मोट बांधत नवी आघाडी उघडली आहे. परिवर्तन महाशक्ती आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहे.

या तिसर्‍या आघाडीत विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच हालचालींना वेग आला आहे. त्यातच आता या परिवर्तन महाशक्ती (Parivartan Mahashakti) या आघाडीने मोठा निर्णय जाहीर केला आहे.

पुण्यात गुरुवारी (ता.17) परिवर्तन महाशक्ती आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत 150 जागा लढण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागांसह आणखी काही मतदारसंघाबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचीही भूमिका या बैठकीतील सहभागी नेतेमंडळींनी बोलून दाखवली.

या बैठकीला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे,प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) उपस्थित होते. या बैठकीत महाविकास आघाडी असो वा महायुती या दोन्हींविरोधात लढण्याची भूमिका घेतली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी उमेदवार देण्यावरही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

तिसर्‍या आघाडीत जरांगे पाटील,जानकरांचा सहभाग..?

महायुती व महाविकास आघाडीविरोधात तगडं आव्हान उभं करण्याच्या तयारीत असलेल्या तिसरी आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.त्यात आता अधिकाधिक पक्षांना सोबत घेण्यासाठी धडपड सुरू आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह महायुतीतून नुकतेच बाहेर पडत स्वबळाचा नारा दिलेल्या महादेव जानकरांच्या रासपलाही परिवर्तन आघाडीत घेण्यासाठी कंबर कसली आहे.बरेच लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले,आमच्या आघाडीत सध्या 30 ते 40 लहान मोठ्या संघटना आहे. त्यामुळे प्रस्थापित उमेदवारांविरोधात लढा दिलेल्यांना आम्ही संधी देणार आहोत.

याचवेळी संभाजीराजे यांनी आपण मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोललो आहे, पण त्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यांनी आमच्यासोबत यावं असं आम्हांला वाटतं असंही त्यांनी यावेळी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सामाजिक चळवळीची पार्श्वभूमी असलेले छोटे छोटे पक्ष, स्थानिक सामाजिक संस्था यांना एकत्र करुन त्यांची मोट बांधून तिसरी आघाडी स्थापन केली आहे.

महाराष्ट्रात सध्या राजकारणाची पातळी घसरली आहे. आम्हाला राजकीय व्यवस्थेत बदल घडवायचा आहे. ते घडविण्याचा मार्ग म्हणून आम्ही निवडणुकीकडे बघतो. संपूर्ण परिवर्तन करु एवढी सध्यातरी आमची ताकद नाही. पण महायुती असो वा महाविकास आघाडीसमोर तगडं आव्हान उभं करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT