<div class="paragraphs"><p>Sindhutai Sapkal</p></div>

Sindhutai Sapkal

 

Sarkarnama

पुणे

सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने पंतप्रधानांना दु:ख; म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे मंगळवारी (ता. 4) रात्री सव्वा आठच्या सुमारास पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्याच्या निधनानंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी याबाबत ट्विट करत म्हटलं आहे की, सिंधुताई सपकाळ यांनी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्या नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या प्रयत्नांमध्ये अनेक मुलांना चांगल्या दर्जाचे आयुष्य जगता आले. त्यांनी समाजातील उपेक्षितांसाठीही मोठं काम केलं आहे. त्यांच्या निधनामुळे दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो, ओम शांती, अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनीही दु:ख व्यक्त करत म्हटले आहे की, सिंधुताई सपकाळ यांचे आयुष्य खुपच प्रेरणादायी होते. त्यांनी अनाथ, आदिवासी आणि उपेक्षांची सेवा केली. त्यांच्यावर अपार प्रेम केलं. त्यांना 2021 मध्ये पद्मश्री देण्यात आले. त्यांनी अविश्वसनीय धैर्याने स्वतःचे आयुष्य घडवलं, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. सिंधुताई यांच्या निधनानं समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचं मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनानं महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

दरम्यान, सिंधुताई यांना दीड महिनाभरापूर्वी हर्नियाचा त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. त्यांनी पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. त्या संस्थेच्या माध्यमातून त्या अनाथ मुलांना सांभाळत असत. संस्थेत मुलांना सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील, यासाठीही त्यांचे प्रयत्न असायचे. अनाथ आणि बेवारस मुलांना आधार देण्याचे फार मोठे काम सिंधुताई यांनी आपल्या जीवनात केले. हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांची माय बनलेल्या सिंधुताई यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT