Pune News : पंढरपूरच्या आषाढी वारीकडे राज्यभरातील वारेकऱ्यांचे लक्ष लागलेल्या आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे 19 जून रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. लाखो वारकरी या भक्तीपूर्ण सोहळ्यात दरवर्षी सहभागी होतात. याच पार्श्वभूमीवर पुण्यात पालख्यांच्या नियोजनासाठी प्रशासन जोर लावून कामाला लागले आहे.
पुणे (Pune) शहरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन होत आहे.याच धर्तीवर महापालिका प्रशासन अन लोकप्रतिनिधींनी बैठकांचा व पाहणी दौऱ्यांचा धडाकाच लावला आहे. पण त्या तुलनेत सुधारणाची गती कमी असल्याने वारकऱ्यांना चांगले रस्ते, पादचारी मार्ग, स्वच्छता गृहाच्या सुविधा मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच या बैठकांमुळे प्रमुख अधिकारी महापालिकेत नसल्याने कामेही खोळंबत आहेत.
पंढरपूर (Pandharpur) वारीसाठी आळंदी आणि देहूवरून पालख्यांचे प्रस्थान झाल्यानंतर लाखो वारकरी पुण्यात मुक्कामी असतात. त्यामुळे त्यांच्या सोईसाठी महापालिका प्रशासन व पोलिसांकडून बैठका घेतल्या जातात. त्यानुसार प्रशासनाकडून तयारी केली जाते.
पण यंदाच्या वर्षी प्रशासनाच्या ठरलेल्या बैठका व्यतिरिक्त प्रत्येक लोकप्रतिधीची स्वतंत्र बैठक व पाहणी दौरा, तसेच अधिकाऱ्यांचे स्वतंत्र दौरे व बैठका होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पथ विभाग, क्षेत्रीय कार्यालय व घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छतेची केली जाणारी व्यवस्था, विद्युत विभाग, पाणी पुरवठा विभाग, मलनिःसारण विभाग यांच्याशी संबंधित कामे महत्त्वाची असतात.
यावर्षी बैठकांमध्येच खूप वेळ जात आहे, त्यामुळे पालखी मार्गावरील कामे पूर्ण करण्यास वेळ अपुरा पडत असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. प्रमुख मार्गासह अन्य भागात वारकरी मुक्कामी असतात, ही गैरसुविधा असते, रस्त्यांवर खड्डे आहेत, स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे तेथे कामे होऊ शकलेली नाहीत. त्यातच आज अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी बैठक घेऊन, नियोजन करता पोलिस, महापालिकेत समन्वय ठेवा असे आदेश दिले आहेत. तसेच सर्व कामे पूर्ण झाल्याचा दावाही केला आहे.
पुणे शहराच्या हद्दीत दिंड्या प्रवेश केल्यानंतर मोजके स्वच्छतागृह रस्त्यावर आहेत. वारकऱ्यांची संख्या लाखोंमध्ये असली तरी मोबाईल टॉयलेटची संख्या कमी असते. तसेच ज्या ठिकणी स्वच्छतागृह, मोबाईल टॉयलेट असले तरी तेथे पाणी नसते, स्वच्छता केली जात नसल्याने त्याचा वापर करता येत नाही. महिलांचीही कुचंबणा होते. त्यामुळे महापालिकेने याचे व्यवस्थित नियोजन केले पाहिजे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.