Ravindra Dhangekar, Vasant More Sarkarnama
पुणे

Vasant More News: धंगेकरांची प्रसिद्धी वसंत तात्यांच्या डोळ्यात खुपली? पत्रकारांना म्हणाले, "तुम्हाला फक्त रवींद्र..."

Jagdish Patil

Vasant More On Ravindra Dhangekar: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात 19 मेच्या पहाटे मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवत एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बाईकवरुन घरी निघालेल्या दोघांना चिरडलं. यानंतर या अल्पवयीन मुलाला 15 तासांत जामीन मिळाला आणि हे अपघात प्रकरणी सोशल मीडियावर व्हायरल झालं. लोकांनी पोलिसांच्या कृतीवर संताप व्यक्त करायला सुरुवात केली.

सुरुवातीला साधं वाटणारं हे प्रकरण आता मंत्रालयापर्यंत गेल्याचं पाहायला मिळत आहे. तर या अपघात प्रकरणी पहिल्यापासून महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवाय धंगेकर या प्रकरणी रोज एक नवीन दावा आणि खुलासा करत आहेत. (Kalyaninagar Accident News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, पुणे कार अपघात प्रकरणी मीडिया केवळ रवींद्र धंगेकरांवर फोकस करत आहे. असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी केला आहे. शिवाय यावरुन ते चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, "तुम्हाला फक्त धंगेकरच दिसतात का? भरपूर ठिकाणी तुम्हाला धंगेकर दिसत आहेत. जो विषय चालला आहे, त्याबद्दल विचारा. आम्ही देखील या घटनेचा निषेध केला. सर्वात आधी आम्हीच त्याबाबत आवाज उठवला. मीडियाला फक्त धंगेकरच दिसतात, अशा शब्दात मोरेंनी आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे आता धंगेकरांची प्रसिद्धी वसंत तात्यांच्या पचनी पडत नाही की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. तसंच या अपघातप्रकरणी आता श्रेयवादही सुरू झाल्याचं दिसत आहे.

आव्हाडांना आता मानसोपचाराची गरज

आज महाड येथे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. या घटनेवरुन वसंत मोरे चांगलेच आक्रमक झाले असून या घटनेचा निषेद करण्यासाठी त्यांनी आज पुण्यात आंदोलन करत आव्हाडांचा निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी आव्हाडांच्या अटकेची मागणी केली. शिवाय आव्हाडांना आता मानसोपचाराची गरज असल्याचा टोलाही मोरे यांनी लगावला.

या प्रकरणी बोलताना वसंत मोरे म्हणाले, "आव्हाड राज्यातील शांतता बिघडवण्याचं काम करत आहेत. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत ते सुधारणार नाहीत. प्रत्येकवेळी चुका करतात आणि नंतर माफी मागतात. त्यांनी काही पहिल्यांदाच माफी मागितलेली नाही. त्यांनी बाबासाहेबांचा (Dr. Babasaheb Ambedkar) फोटो फाडला आहे. याचे काय परिणाम होणार हे त्यांना महाराष्ट्रात फिरताना जाणवेल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT