Pune News : विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा नसताना देखील पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने अनेक नेत्यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली होती. यानंतर या नेत्यांचे पक्षांकडून निलंबित करण्यात आले.
मात्र आता निवडणुकीनंतर या सर्व नेत्यांची घर वापसी होणार का? प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या नेत्यांकडून आता तशी मागणी होऊ लागली आहे.
पुण्यातील (Pune) पर्वती विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडीतून काँग्रेसला सुटावा, अशी मागणी आबा बागुल यांनी केली होती. मात्र हा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे गेला. यावर माजी उपमहापौर आबा बागुल यांनी अपक्ष अर्ज भरत निवडणूक लढवली. आता निलंबन मागे घ्यावे, पुन्हा पक्षात घ्यावे, अशी मागणी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे आबा बागुल यांनी केली आहे.
आबा बागुल म्हणाले, "एकेकाळी पार्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस (Congress) पक्षाचा बालेकिल्ला होता. आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनाच उभारी मिळाली". शिवाय काँग्रेस विचारधारेच्या मतदारांची 'व्होट बँक' ही राखता आली. त्यामुळे कोणतेही पत्र न देता आणि म्हणणे ऐकून न घेता पक्षातून निलंबन केले असल्यास ते तातडीने मागे घ्यावे आणि काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असल्याचे पत्र द्यावे, असेही बागुल यांनी म्हटले.
यासंदर्भात आबा बागुल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रशासन आणि संघटक उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्यासह निरीक्षक रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्व नेत्यांना पत्र पाठवले आहे. पर्वती मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेली पंधरा वर्षे आहे. मात्र त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार सलग तीन वेळा मोठ्या मताधिक्याचे फरकाने पराभूत झालेले आहेत. यंदाच्या निवडणुकीतही पुन्हा त्याच पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने पराभूत झाल्याकडे आबा बागुल यांनी लक्ष वेधले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेमध्ये यामधील तरतुदींचा कोणताही विचार न होता, मला नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार माझे खरे व योग्य म्हणणे ऐकून न घेता, तसेच कोणतेही लेखी अथवा तोंडी खुलासा करण्याची संधी न देता, तसेच मला पक्षातर्फे अधिकृतरित्या कोणतीही निलंबनाची नोटीस आजमितीपर्यंत कोणत्याही मार्गाने व कशाही प्रकारे मिळाली नाही. निलंबनाची माहिती प्रसार माध्यमांद्वारे समजली आहे. तसंच काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध मी निवडणूक लढवली नाही. त्यामुळे मी पक्षाची शिस्तभंग केलेली नाही. तरी या कारणामुळे माझे पक्षाने निलंबन केल्यास ते तातडीने मागे घेऊन, मला काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असल्याचे पत्र द्यावे, असेही आबा बागुल यांनी पत्रात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.