Ajit Pawar, Chandrakant Patil
Ajit Pawar, Chandrakant Patil sarkarnama
पुणे

पाणी गळतीवरून पुण्यात राजकारण; अजितदादांनी आधिकाऱ्यांना ‘धुतले’ तर चंद्रकांतदादांकडून पाठराखण !

ब्रिजमोहन पाटील : सरकारनामा ब्यूरो

Chandrakant Patil and Ajit Pawar News : पुणे महापालिकेचे यापूर्वीचे आयुक्त सौरभ राव,शेखर गायकवाड आणि सध्याचे आयुक्त विक्रम कुमार आहेत. या तिघांचीही पुण्यातील पाणी गळतीबाबतची उत्तरे सारखीच आहेत. त्यात काहीच बदल होत नाही. जर सप्टेंबर २०२३ पर्यंत पाणी गळती कमी झाली नाही तर आयुक्त ज्या ठिकाणी काम करत असतील त्या पदाचा पदाचा राजीनामा द्यावा अशा शब्दांत माजी विरोधी पक्षनेते व पुण्याचे माजी पालकमंत्री अजित पवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

त्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांची पाठराखण करताना तुमची एवढ्या वर्ष सत्ता होती, त्यावेळी गळती का रोखली नाही? असा प्रतिप्रश्‍न पवार यांना केला. मात्र,पुण्याच्या दोन दादांमध्ये पाणी प्रश्नावरुन चांगलाच सामना रंगलेला पाहायला मिळाला.

पुण्याच्या पाणी प्रश्‍नावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी यांनी शहरातील व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. यात पुण्याच्या पाणी गळतीवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीनंतर अजित पवार म्हणाले, मी पालकमंत्री असताना पाणी गळतीवर जी उत्तरे दिले जात होती, तिच उत्तरे आता चंद्रकांत पाटील यांना देऊन महापालिकेचे अधिकारी वेळ मारून नेत आहेत. कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत आयुक्तांनी ४० टक्के गळती होत असल्याचे सांगितले. पण ही गळती जलवाहिनी, कालव्यातून होत असल्याने ते पुणेकरांना मिळत नसल्याने जास्त पाणी वापराचा आरोप चुकीचा आहे. आणि पाणी गळती रोखली नाही तर आयुक्तांनी राजीनामा द्यावा अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीकेचा सूर आळवला.

न्यायालयाने पाणी पुरवठ्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या या उत्तरांची गंभीर दखल घेतली जाईल,त्यांना न्यायालयात वस्तुस्थिती सांगावी लागणार आहे. त्यावेळी दूध का दूध पानी का पानी होईल असे स्पष्ट मत पवार यांनी व्यक्त केले.

अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने हा प्रश्‍न संपणार नाही. पुढील दोन वर्षात समान पाणी पुरवठा योजनेचे काम दोन वर्षात पूर्ण होऊन पाणी गळतीचा विषयच संपेल. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने सादरीकरण केले. पण त्यामुळे समाधान झाले नाही म्हणून टीका करणे योग्य नाही. तुमची सत्ता असूनही २० वर्षे या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष दिले नाही. आता आम्ही उपाययोजना करत आहोत. पाणी गळती रोखण्यासाठी समान पाणी पुरवठा योजनेतून ८२ टाक्या बांधल्या जाणार आहेत, जून २०२४ पर्यंत जलवाहिनी टाकण्याचे कामही पूर्ण होईल. त्यामुळे सध्याची ४० टक्के गळती रोखली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी उत्तम पद्धतीने सादरीकरण केले, यात अधिकाऱ्यांची काहीही चूक नाही.

पुण्याच्या पाणी प्रश्‍नावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत ग्रामीण भागातील आमदारांनी महापालिका गळती कमी करत नाही, दुसरीकडे पाणी वापर वाढवत आहेत, त्यामुळे शेतीला पाणी कमी मिळत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले पण त्यावर समाधान न झाल्याने तेच तेच उत्तर दिले जात असल्याची टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT