Hutatma Rajguru school
Hutatma Rajguru school sarkarnama
पुणे

ZP सभागृहात फाईल फेकली : हुतात्मा राजगुरूंच्या शाळेचा मुद्दा पेटला.. अखेर मागे घेतला...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : खेड तालुक्यातील (Khed Taluka) विविध प्रकल्पांच्या जागानिवडी वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची प्रकरणे अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत जातात. त्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या जागांच्या निमित्ताने शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा स्थानिक भडकाही उडतो. पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अशाच एका प्रकल्पाच्या जागेवरून रात्री उशिरापर्यंत वाद झाला आणि त्यातून प्रशासनाला पर्यायाने सत्ताधााऱ्यांना माघार घ्यावी लागली.

पुणे जिल्हा परिषदेची 18 फेब्रुवारी 2022 या पंचवार्षिक कालावधीमध्ये शेवटची सर्वसाधारण सभा होती.   उपाध्यक्ष रणजित शिवतारे  यांनी  अर्थसंकल्पाची मांडणी आणि त्यावर सदस्यांनी मांडलेल्या भूमिका या नंतर विषय पत्रिकेनुसार सभेचे कामकाज सुरू झालेले.   तशी सभा खेळीमेळीच्या वातावरणात सुरू होती. सदस्यांना  स्मृतिचिन्ह, शाल आणि समूह फोटो देऊन सन्मान झालेला असल्याने एक भावूक वातावरण होते.  बजेट वरील सदस्यांच्या भूमिका आणि विविध प्रश्‍न मांडत असताना रात्रीचे जवळपास 9 वाजले होते.

Pune ZP GB

विषय क्रमांक 786 पुकारण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजगुरुनगर क्रमांक 1 व 2 स्थलांतरित जिल्हा परिषद मालकीच्या आणि अन्य सोयीच्या ठिकाणी करणे तसेच सदर शाळेची जागा सिटी सर्व नो.1054  ही महसूल प्रशासकीय इमारतीसाठी महसूल विभागात हस्तांतरित करणे, असा हा मुद्दा होता.

विषय पुकारताच सदस्य बाबाजी काळे उठले आणि त्यांनी या विषयाला माझा विरोध आहे शाळेची जागा हस्तांतरित करू नका नाहीतर मला आत्मदहन करावे लागेल. तुम्ही राजकीय दबावाला पडून आपल्या सर्व जागा गमावू नका. तुमचे नाव अशाने खराब होईल. यापूर्वी तुम्ही पंचायत समिती इमारतीचे काम थांबवून चुकीचे पद्धतीने आपली जागा महसूल विभागाला देण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा याला विरोध आहे.यापूर्वी देखील तुम्ही असेच चुकीचे विषय पुढे आणून सत्तेचे जोरावर मंजूर करून घेतले आहे पण आम्ही त्यात न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी आक्रमक भूमिका बाबाजी काळे यांनी मांडली.

त्यानंतर सदस्य अतुल देशमुख यांनीही इथली सविस्तर माहिती दिली. या शाळेत गरिबांची मुले शिकतात त्यामुळे हा ठराव करू नका ही भूमिका मांडली. आपण जी नवीन जागा सुचवली तिथे अजून वाद आहे. तिथे एकदा आरोग्य केंद्रासाठीच्या कामाचा नारळ फोडूनही काम झाले नाही. नवीन शाळा वेळेत नाही झाली तर ही मुले कुठे बसणार, असा सवाल उपस्थित केला. याशिवाय या शाळेत हुतात्मा राजगुरू शिकले आहेत .त्या शाळा खोल्यांचे आपण सरंक्षण केले आहे. त्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी भेट दिली आहे आणि आपण त्यावर 10 लाख रुपयांची निधी देवून काम केले. हा भावनिक विषय आहे. ही शाळा हस्तांतरीत करू नका, अशी मागणी देशमुख यांनी केली.

त्यात मध्येच खेड पंचायत समिी चे सभापती अरुण चौधरी यांनी त्या शाळेत राजगुरू शिकलेच नाही असे वक्तव्य केले आणि वाद पेटला. अतुल देशमुख प्रचंड चडले आणि त्यांनी अतिशय आक्रमक होत चौधरी याना जाब विचारला. मग राजगुरू कुठे शिकले ते सांगा, असे म्हणत त्यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या आसनाकडे झेप घेतली. त्यांना इतर सदस्यांनी अडविले.  यावरून मोठा गदारोळ झाला. सभेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी पाहत राहिले.वातावरण अधिक गोंधळाचे झाले होते पण सत्ताधारी हा विषय मागे घ्यायला तयार नव्हते. 

ही सर्व परीस्थिती लक्षात घेऊन अनुभवी सदस्य शरद बूट्टे पाटील यानी उभे राहून त्यांनी भूमिका मांडली.  अतुल देशमुख हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे याबाबत नाते आहे. चौधरी तुम्ही असे वक्तव्य करायला नको होते पण आता व्यक्तिगत पातळीवर विषय आणू नका, असे आवाहन त्यांनी केले. या विषयात राजकारण नको, असे म्हणत या विषयात प्रशासकीय पातळीवर अनेक चुका झाल्या आहेत. अध्यक्षा निर्मला पानसरे यांची राजकीय अडचण आहे पण मुख्य कार्यकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी हा विषय नीट हाताळला नाही. मुळात हा विषय या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये तुम्ही अर्धवट मांडला. त्यात कोणताही तपशील नाही. जागा किती ?इमारत किती ? कशातून बांधली ? नवीन जागा ताब्यात आहे का ? तिथे मारत कोण बांधणार ? किती दिवसात बांधणार ? याचा काहीही तपशील विषयात दिला नाही. तुम्ही अधिकारी असे मोघम विषय असे आणता, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. इथे आता असलेली आरसीसी इमारत सर्व शिक्षा अभियान मधून बांधण्यात आलेली आहे आणि अशा इमारती पाडण्यासाठी किंवा हस्तांतरित करणे साठी राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेची परवानगी लागते.ती आपण घेतली आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले.

या प्रश्नाने मात्र प्रशासन निरुतरित झाले. या शिवाय ही जागा शाळेसाठी जर एखाद्या व्यक्तीने दान दिली असेल आणि हेतू बदल केला तर जागा मूळ मालकाला द्यायला लागू शकते, असा मुद्दा बुट्टे यांनी उपस्थित केल्यानंतर सभागृह शांत झाले. त्यात पदाधिकारी आणि अधिकारी यांचे सह सत्ताधारी पक्षाला देखील हा विषय घेऊ नये असे वाटत होते पण बोलण्याचे धाडस कुणी करत नव्हते. सर्वपक्षीय सदस्यांच्याही लक्षात हे मुद्दे आले होते.

एरव्ही शांतपणे मुद्दे मांडणारे शरद बुट्टे पाटील कमालीचे आक्रमक झाले होते. रागाच्या भरात त्यांनी या विषयाची हातात असलेली फाईल चुकीचा विषय मांडला म्हणुन प्रशासनाचे दिशेने फिरकावली देखील. अखेर त्यांना शांत करणेसाठी  मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आपले आसंन सोडून खाली येवून  यांना शांत करत होते.

 अध्यक्ष आपली बाजू मांडत होत्या.आपल्या नेत्याचा आदेश म्हणून त्यांनाही हा विषय मंजूर करणे गरजेचे होते. अशा स्थितीत शरद बुट्टे पाटील यांनी आपले सभाशास्त्र अस्त्र बाहेर काढले.  सभागृहात कोरम आहे का असे विचारले.तेंव्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आता कोरम एवढे सदस्य उपस्थित नाही असे जाहीर केले. बुट्टे पाटील यांनी आता तुम्हाला हा विषय घेता येणार नाहीआणि पुढचे विषय देखील होणार नाही, अशी भूमिका मांडली त्यावर सभागृह थांबले. आणि मग सत्ताधारी पदाधिकारी यांनी विचार विनिमय केल्यानंतर हा विषय मागे घेत असल्याचे जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT