Raj Thackeray
Raj Thackeray  Sarkarnama
पुणे

Raj Thackeray : 'कोणत्या मुद्दयावर बाळासाहेबांशी झाले होते मतभेद?' ; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!

उत्तम कुटे

पिंपरी : पिंपरीत सुरु असलेल्या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात, तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी व्यंगचित्रकार व मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज (ता.८) सहभागी झाले. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी पहिला वाद कशावरून झाला, त्याचा गौप्यस्फोट केला. तसेच राज्यकर्ता हा व्यापारी नसावा तर मोठ्या मनाचा असावा, असा मार्मिक टोला त्यांनी सध्याच्या सूडाच्या राजकारणावर लगावला.

मुंबईतील दहा लाख झोपडपट्टीधारकांना मोफत घरे देण्यावरून बाळासाहेबांशी वाद झाला होता, असे राज ठाकरे म्हणाले. कारण त्यामुळे देशभरातून मुंबईत लोंढे येण्यास सुरवात झाली अन् त्यातून शहराची वाताहत झाली,असे ते म्हणाले.'व्यंग- वास्तव व राजकारण' या परिसंवादात ते बोलत होते. दीड तासांमध्ये त्यांनी व्यंगचित्र कलेचे रूप, वास्तव आणि राजकारण उलगडून दाखवले.

सध्या सूडापेक्षाही बडबडण्याचे राजकारण जास्त झाले असल्याची कोपरखळी त्यांनी सध्या राजकीय नेत्यांच्या सुरु असलेल्या तू,तू,मैं,मैंच्या राजकीय परिस्थितीवर मारली. व्यंगचित्रकलेला परदेशातही ओहोटी लागली असून, त्याला सोशल मीडिया कारणीभूत असल्याचे सांगितले.

काहींनी राजकारण खराब केले असून, ते दुरुस्त करण्यासाठी तरुणांनी राजकारणात आले पाहिजे, असे अपेक्षावजा आवाहन राज यांनी यावेळी केले. मी चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणतो, म्हणून मी बदललोय की काय,असं तुम्हाला वाटतं, असे सांगत त्यांनी त्यांच्या वरचेवर बदलत्या भूमिकेचे समर्थन केले. तसेच जागतिक संमेलने कशी भरवता, महाराष्ट्र संमेलने भरवा,कारण इथे बुडाखाली आग (बेरोजगारीची) लागलीय, त्याकरिता स्थानिकांना नोकऱ्यांत घेण्याचे निर्बंध उद्योगांवर घाला, असे त्यांनी वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नांवर व्यक्त केले.

न्यूज चॅनेलनी राजकारण्यांना दाखवणे बंद केले, तर त्यांची थोबाडं (व्यर्थ बडबड) बंद होतील, असे भाष्य राज यांनी सध्याच्या नेत्यांच्या वाढलेल्या वटवटीवर केले. १९९५ पुर्वीचा आणि नंतरचा महाराष्ट्र वेगळा आहे, असे सांगताना १९९५ पूर्वी आय़ुष्यात शांतता होती. त्यानंतर आलेल्या स्थित्यंतराने, चॅनेल्स, इंटरनेटमुळे आय़ुष्याला वेग आला. मात्र, शहरांची वाताहत झाली. त्यांची बेसूमार वाढ झाली,असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही राज्यावर इम्पॅक्ट करणारी माणसे असून, त्या काळात डोक्यात ती फीट बसलेली असल्याने जुन्या हीट गाण्याप्रमाणे त्यांचा प्रभाव सध्याही आहे,असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT