Raju Shetti
Raju Shetti Sarkarnama
पुणे

जो आडवा येईल, त्याला तुडवायचा, हेच माझे धोरण

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर नाराज अन भाजप सरकारवर खूष आहे, असं काही नाही. माझी वाटचाल अशीच असणार आहे. जो शेतकरीहिताच्या आडवा येईल, त्याला तुडवायचा, हेच माझे धोरण आहे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. (Raju Shetty met the Sugar Commissioner regarding the one-time FRP)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शेट्टी बोलत होते. ते म्हणाले की, पुण्यात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासोबत ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यांची एफआरपीबाबत बैठक झाली. जयसिंगपूर येथे ता. १९ ऑक्टोबर रोजी ऊस परिषद झाली, त्यात काही ठराव झाले होते, त्याची प्रत आयुक्त गायकवाड यांना देण्यात आली आहे. साखर कारखान्यांनी गाळप झालेल्या उसाची एकरक्कमी एफआरपी दिली पाहिजे. त्यात डिसेंबरमध्ये तीन हजार तीनशे एवढी द्यावी आणि राहिलेली रक्कम जानेवारीपर्यत द्यावी. ती तुकड्या तुकड्यात दिला जात आहे, शेतकऱ्यांचे पैसे कारखानदारांकडे ३२ महिने राहतात, त्याच्या व्याजाचं काय, असा प्रश्नही शेट्टी यांनी उपस्थित केला.

केंद्रातील भाजप सरकारने साखरेचे भाव ३७ रुपये करावेत. तसेच, नाबार्ड ज्या प्रकारे डेअरी उद्योगाला कर्ज देते, त्या प्रमाणे साखरेला का देत नाही. ही जबाबदारी शरद पवार यांची होती. पण, साखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे झाले आहेत, असा आरोप करून शेट्टी म्हणाले की, राज्यात ९ लाख ऊसतोडणी कामगार आहेत. उसतोडणी मजुरांच्या गोपीनाथ मुंडे महामंडळला केंद्र सरकारने मदत करावी. ऊसतोडणी मजुरांची नावनोंदणी करावी,अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यातील जे कारखाने एकरक्कमी एफआरपी देणार नाहीत, ते कारखाने आम्ही चालू देणार नाही. तसेच, राज्य सरकारच्या अखत्यारित असलेली ऊसदर नियंत्रण समितीच दुबळी बनली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

‘जरंडेश्वर’च का, इतर कारखान्यांचं काय

जरंडेश्वर साखर कारखान्यासोबत ४३ कारखाने आहेत. मग फक्त जरंडेश्वरच का निवडला? किरीट सोमय्या यांना माझा प्रश्न, बरं हे कारखाने शेतकऱ्यांना मिळणार आहेत का? गैरसोयीच्या माणसाचं बाहेर काढायचं अन सोयीच्या माणसाचं झाकून ठेवायचं, हे यातून दिसते आहे. मी सहा वर्षांपूर्वी हेच सांगत होतो. लिस्ट फार मोठी आहे, सगळे चोर आहेत, पण, चोरांना सरकार पाठीशी घालत आहे, असेही ते म्हणाले.

त्या माणसावर मी जास्त बोलणार नाही

हर्बल तंबाखू लागवडीचा पहिला प्रयोग आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्या शेतात करावा, असा टोला माजी खासदार शेट्टी यांनी खोत यांना लगावला. तसेच, त्या माणसावर मी जास्त बोलणार नाही, अशी सूचक टिप्पणीही केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT