Ajit Pawar Rohit Pawar Sarkarnama
पुणे

Rohit Pawar : 'विचार सोडला म्हणून अजितदादांना धोका मिळाला', रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Sudesh Mitkar

Pune News : बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या पराभवाबाबत खंत व्यक्त केली. विकास कामं करूनही मतं मिळाली नाहीत. त्यामुळे बारामतीकरांना दुसरा आमदार मिळायला हवा, जेणेकरून ते त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये तुलना करतील, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार म्हणाले, दादा असं का म्हणाले हे सांगता येणार नाहीत. कदाचित ते भावनिक झाले असावे अथवा त्यांना लोकांना भावनिक करायचं असेल.

'तुम्ही घर सुंदर बांधलं त्याला मार्बल बसवलं, सोन्याच्या खिडक्या लावल्या मात्र तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये प्रेम नसेल, नातं नसेल, विचार नसेल तर इतक्या मोठ्या घराचं करायचं काय? विकास महत्त्वाचा आहे. परंतु त्याच्याबरोबर विचार देखील महत्त्वाचे आहेत. विचार सोडल्यामुळे दादांना तिथे कुठंतरी धोका झाला असं म्हणता येईल.', असं रोहित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

महाराष्ट्रात स्वाभिमानी लोक असून बारामतीसह महाराष्ट्रात लोकांनी महायुतीला नाकारून महाविकास आघाडीला मतं दिली. यातून लोकांना विचार महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट झाला आहे, असे देखील रोहित पवार यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार असताना ज्या पद्धतीने अजितदादांना काम करता येत होतं त्या पद्धतीचं काम महायुतीच्या सरकारमध्ये राहून त्यांना करता येत नसल्याचे दिसून येत आहे. महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजप असून तो दिल्लीतील आदेशावर चालत असल्याची टीकाही रोहित पवारांनी केली.

रोहित पवार म्हणाले, बारामतीची जनता ही विचारांचा विचार करते. ज्या विचारांविरोधात अजितदादा 35 वर्ष लढले त्यांच्यासोबतच ते गेले आहेत. एका बाजुला अजित पवार हे लोकांना सांगतात की कुटुंब फूटू देऊ नका आणि दुसऱ्या बाजूला भाजपाला त्यांनी पक्ष आणि कुटुंब फोडून दिले हे विरोधाभासी आहे

...तर अजितदादा वेगळं लढतील

'भाजप लोकनेत्यांना घेतं आणि संपवून टाकतं, हा त्यांचा इतिहास राहिला आहे. असचं काहीसं सध्या अजितदादांबरोबर सुद्धा होताना पाहायला मिळतं आहे. हे दादांना समजलं असेल त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून त्यांचा पक्ष वेगळ्या प्रकारची भूमिका घेत आहे. जी भाजप आणि शिवसेनेपेक्षा वेगळी आहे. अशा पद्धतीत ते स्वतःहून वेगळे लढतील अथवा वरून आदेश आला म्हणून मत खाण्यासाठी वेगळं लढू शकतात', असं रोहित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT