Rupali Thombre
Rupali Thombre sarkarnama
पुणे

..तरीही भाजपमध्ये घराणेशाही नाही बरं का?

सरकारनामा ब्युरो

पुणे : घराणेशाहीच्या विषयावरुन नुकत्याच मनसेतून राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये गेलेल्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre) यांनी भाजपवर टीका केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. भाजपमध्ये तिकीट वाटपात घराणेशाहीच दिसून येत असल्याचे निरीक्षण रुपाली पाटलांनी नोंदविलं आहे. त्यांनी टि्वट करीत भाजपमधील घराणेशाहीवर लक्ष वेधलं आहे.

राजकीय पक्षांनी घराणेशाहीचे उमेदवार दिल्याने निवडणुकीत ‘घराणेशाही’ हा मुद्दा बनत नाही. शिवसेना-भाजप (BJP) पूर्वी हा मुद्दा सातत्याने मांडत, पण आता शिवसेनेच्या नेतृत्वात घराणेशाही आली व मोठी घराणी भाजप-सेनेत गेल्याने तो मुद्दा निवडणुकीत राहिला नाही. त्यामुळे घराणेशाही सर्वपक्षीय झाल्याचे या विधानसभा निवडणुकीत दिसते. पूर्वी हे घराणेशाहीचे उमेदवार फक्त राष्ट्रवादी (ncp) व काँग्रेसचेच (Congress) असायचे, पण 'आयाराम-गयाराम' नंतर इकडी घराणी तिकडे गेली.

विरोधक नेहमीत कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसला घराणेशाहीवरुन टीका करीत असतात, त्याला रुपाली पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचे नेते, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांची राजकारणातील घराणेशाही (वंशावळ) टि्वट करीत ठोंबरे पाटलांनी टीका केली आहे. राजनाथ सिंग यांचे चिरंजीव, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचे नातू, खासदार हुकूम सिंग यांची कन्या यांचे फोटो ट्विट केले आहेत. आणि तरीही भाजपमध्ये घराणेशाही नाही बरं का. असा टोमणा त्यांनी लगावला.

आपल्या टि्वटमध्ये रुपाली पाटील म्हणतात, ''लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. घराणेशाहीला विरोध करता करता भाजपात कधी घरणेशाही घुसली भाजपाला समजलच नाही? घराणेशाही च्या विरोधात लढणारी पार्टी म्हणे. पार्टी विथ डिफरेन्स,''

पुण्यातील एका कार्यक्रमात खासदार बापट यांनी तर स्पष्टच सांगितले की ‘जुना कार्यकर्ता महत्त्वाचा हे खरे, पण निवडून येण्याची क्षमताही महत्त्वाची.’ थोडक्यात आजची भाजपा ही पूर्वी ‘निवडून येण्याची क्षमता’ या एकमेव निकषांवर गल्लीतल्या गुंडापासून धनदांडग्या पुंडापर्यंत कुणालाही तिकिटे देणाऱ्या काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकून चालू लागलेली दिसते. त्यात सामान्य कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाचे मोल शून्य झाले आहे.

ज्या नेत्यांविरोधात जीव ओतून प्रचार केला, ज्यांचे वाभाडे काढले, ज्यांच्या कार्यकर्त्यांशी उभा दावा मांडला; त्याच नेत्यांसाठी आता प्रचार करण्याची वेळ सामान्य कार्यकर्त्यांवर आलेली दिसते. पण या कार्यकर्त्यांची मानहानी इथेच थांबत नाही, तर या आयारामांच्या पुढच्या पिढीसाठीही राबावे लागते आहे. घराणेशाहीचा तीव्र विरोध करत सत्तेवर आलेली भाजपा सत्तासोपान दुसऱ्यांना चढून जाण्यासाठी तिचाच आधार घेते आहे!

दोन दिवसापूर्वी भाजपचे मंत्री हरक सिंह रावत त्यांच्या कुटुंबियांसाठी तीन तिकिटांची मागणी केली. ही मागणी पक्षनेतृत्वाला मान्य नव्हती. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की आम्ही कोणालाही एकाच घरात तीन तिकीट देणार नाही. भाजप घराणेशाहीपासून दूर असलेला पक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT