Sharad Pawar sarkarnama
पुणे

शिंदे सरकारच्या 'त्या' घोषणेची चिरफाड करताना पवारांची भू विकास बॅंकेचा इतिहासच मांडला

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar News : भू विकास बँकेच्या कर्जमाफीबाबत शिंदे सरकारकडून केला जाणारा दावा पूर्णपणे फसवा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता.

पवार एका कार्यक्रमात बोलत होते. पवार म्हणाले राज्य सरकारचा दावा खोटा आहे. भू विकास बँकेतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, असे राज्य सरकार सांगत आहे. मात्र गेल्या १० वर्षांमध्ये किमान एका शेतकऱ्याला तरी भू विकास बँकेचे कर्ज मिळाले आहे का? असा सवाल पवार यांनी केला. भू विकास बँक अस्तित्त्वात आहे, ही गोष्ट तरी तुम्हाला माहिती आहे का, भू विकास बँक एकेकाळी होती. मात्र, आता ती राज्यात कार्यरत नाही, असे पवार यांनी सांगितले.

आता भू विकास बँकेचे नावही कोणाला माहित नाही. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून या बँकेने दिलेल्या कर्जांची वसुली झालेली नाही. ही वसुली होणार नाही, हे कळल्यानंतर राज्य सरकारने घोषणा केली की आम्ही भू विकास बँकेतील शेतकऱ्यांची कर्जे माफ करत आहोत, असे सांगितले. लबाडाच्या घरचे आवताण जरी असले तरी जेवल्याशिवा खरे नसते, असा टोला पवार यांनी लावला.

दरम्यान, राज्यातील भू विकास बँकेच्या सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांचे ९६४ कोटींचे थकित कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याचा प्रचारही भाजपने केला होता. यावरुन पवार यांनी शिंदे सरकार आणि भाजपवर निशाणा साधला.

राज्यातील शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे शेतीकर्ज देण्यासाठी भूविकास बॅंकेची स्थापना करण्यात आली होती. या बँकेची राज्य स्तरावर शिखर बँक होती. तर प्रत्येक जिल्हयात भूविकास बॅंकेच्या ३० उपशाखा होत्या.

शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या या बँकेचे १९९८ पासून कर्ज वितरण बंद झाले. त्यानंतर बँक अडचणीत आली. २००२ मध्ये या ही बॅंक अवसायनात काढण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानंतर २००८ मध्ये वैद्यनाथन समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने लाभ मिळवून या बँकांचे पुरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतरही ही बॅंक वाचविण्यात यश न आल्याने अखेर २०१३ मध्ये अवसायनात काढण्याचा निर्णय सरकारने घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT