Sharad  Pawar
Sharad Pawar sarkarnama
पुणे

पवारांचीही तीव्र प्रतिक्रिया : व्यवहाराशी संबंध नसलेल्या मुलींवर छापे, हा अतिरेक

मिलिंद संगई, बारामती

बारामती : प्राप्तिकर विभागाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करत जे छापासत्र केले, त्या बाबत आपल्याला फारशी माहिती नाही, मात्र उत्तर प्रदेशातील घटनेवर आपण जी खंबीर भूमिका घेतली त्याची प्रतिक्रीया म्हणून हे छापासत्र झाल्याची शंका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बोलून दाखवली.

बारामतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी ही शंका बोलून दाखवली. आमच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेची केंद्राकडून आलेली ही प्रतिक्रीया असावी असे ते म्हणाले. पवार यांनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने भाजप सरकारशी तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. तसेच भाजप सरकारला हे हत्याकांड घडवून आणणाऱ्या जनरल डायरची उपमा दिली होती. तसेच या हत्याकांडाच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने 11 आॅक्टोबर बंदची हाक दिली आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर बोलताना पवार म्हणाले की अधिकारी अजूनही त्यांचे काम करत असतील तर त्याबाबत आताच बोलणे योग्य नाही. त्यांचे काम पूर्ण झाल्यावर त्या बाबत बोलायला हवे, असे सावध मत त्यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, उत्तर प्रदेशातील घटनांबाबत मी आणि इतर सर्वच विरोधकांनी खंबीर भूमिका घेतली. त्याची प्रतिक्रीया म्हणूनच महाराष्ट्रात प्राप्तिकर विभागाचे छापासत्र आहे अशी शक्यता नाकारता येत नाही. अजित पवार यांची प्रतिक्रीया मी ऐकली. मुलींवर छापे टाकणे ही बाब योग्य नाही. प्राप्तिकर विभागाला अधिकार असला तरी त्याचा वापर करताना काही तारतम्य बाळगण्याची गरज आहे.

कुटुंबातील ज्या व्यक्तींचा व्यवहारांशी संबंध नाही, मुलींवरही छापे टाकणे हा अधिकाराचा अतिरेक आहे, त्यामुळे हा अधिकाराचा गैरवापर किती दिवस मान्य करायचा याचा विचार आता लोकांनीच करायला हवा.किरीट सोमय्या यांचा नामोल्लेख टाळून पवार म्हणाले, काही लोक आरोप करतात आणि त्या नंतर केंद्रीय यंत्रणा कारवाई करायला पुढे येतात, ही बाब सर्वाधिक आक्षेपार्ह आहे.

आगामी काळात एकत्र निवडणूका लढविण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल. या पोटनिवडणूका आहेत, त्या मुळे लगेच निष्कर्ष काढणे योग्य नाही, मात्र महाविकास आघाडी एकत्र येऊन निवडणूकीला सामोरी गेली तर निकाल हा त्यांच्या बाजूने लागेल असा ट्रेंड सध्या दिसतो आहे, एकदम निष्कर्ष काढणे योग्य नाही. मात्र सकृतदर्शनी तरी तसे वाटते आहे, असे त्यांनी सांगितले.

केंद्रात विकासाच्या कामात पक्षविरहीत काम करुन सहकार्य करतात त्यात नितीन गडकरी आहेत, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. केंद्राच्या मदतीने रस्त्यांची कामे करुन घेणे महत्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT