Dilip Walse Patil
Dilip Walse Patil Sarkarnama
पुणे

Walse Patil Challenge : आम्हाला आलेली ईडीची नोटीस घेऊन या, लगेच आमदारकीचा राजीनामा देतो; वळसे पाटलांचे चॅलेंज

डी. के. वळसे पाटील

Manchar News : उपमुख्यमंत्री अजित पवार, मी आणि इतर नेते युती सरकारमध्ये सामील झालो, म्हणजे आम्ही भाजपमध्ये गेलो, असे अजिबात नाही. आजही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहोत. आम्हाला ईडी, सीबीआयची नोटीस आली; म्हणून आम्ही भाजपसोबत गेल्याचा अपप्रचार केला जात आहे. ते चुकीचे आहे. तशी नोटीस कोणाला सापडली तर घेऊन या, आमदारकीचा लगेच राजीनामा देईन, असे चॅलेंज सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ईडीच्या नोटिशीबाबत भाष्य करणाऱ्यांना दिले. (Show the ED notice send by us; I will resign from MLA : Dilip Walse Patil)

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे रविवारी (ता. २० ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर होते. त्यात वळसे पाटील यांनी ईडीवरून बोलणाऱ्यांना खडे बोल सुनावले. भाषणादरम्यान दिलीप वळसे पाटील यांना दोनदा गहिवरून आले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आशीर्वादामुळे मला अनेक मंत्रिपदावर काम करता आले. त्यांच्यामुळेच सलग ३२ वर्षे आमदार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये नुकतेच साखर उद्योगाविषयी बराच वेळ त्यांच्याशी चर्चाही केली. शेजारी बसलेल्या वळसे पाटील यांच्याकडे शरद पवार यांनी पाहिलेसुद्धा नाही, अशी पोस्ट एका महाशयाने टाकली. आत्तापर्यंत मी कधीही कोणाबद्दल वाईट बोललो नाही, पुढेही बोलणार नाही, संभ्रम निर्माण करणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी सौम्य भाषेत उत्तर द्यावे, असे आवाहनही वळसे पाटील यांनी केले.

भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्षपद दहा वर्षे, त्यानंतर मंचर बाजार समितीचे अध्यक्षपदही मी देवदत्त निकम यांना दिले होते. पण, राष्ट्रवादीच्या नावाचे कुंकू लावून गावागावत गटतट आणि भांडणे लावण्याचे काम सुरू होते. त्यामुळे निकम यांच्या वसंतराव भालेराव यांना संधी दिली. मंचर बाजार समितीच्या निवडणुकीत आतून कोणी कोणाला मदत केली, याचा अहवाल माझ्याकडे आला आहे. त्यामुळे माझ्यासोबत ज्यांना राहायचे आहे, त्यांनी आनंदाने राहावं. ज्यांना दुसरीकडे जायचे आहे, त्यांनी खुशाल गेलं तरी हरकत नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सभासद असल्याची पाच हजार प्रतिज्ञा पत्रे तयार करावीत, अशी सूचना जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंबेगाव तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे, आदिवासी नेते सुभाष मोरमारे, विवेक वळसे पाटील, वसंतराव भालेराव, बाळासाहेब बेंडे, ॲड.प्रदीप वळसे पाटील, सचिन भोर, कैलासबुवा काळे, सुषमा शिंदे, राधेश्याम शिंदे, सचिन पानसरे, ज्ञानेश्वर घोडेकर उपस्थित होते.

...म्हणून आम्ही सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला

बोगदा पाडून डिंभे धरणातील पाणी अन्य भागात नेण्याचा प्रयत्न आहे. तसे झाले तर मीना आणि घोड नदीवरील सर्व बंधाऱ्यात फक्त पावसाचेच पाणी साठेल. धरणातून आपल्याला पाणी मिळणार नाही. त्यामुळे जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि पारनेर तालुक्यात भयानक परिस्थिती निमार्ण होऊ शकते. शेवटच्या श्वासापर्यंत पाणी पळविण्याला माझा विरोध राहील. मतदारसंघातील अशा जनहिताच्या आणि विकास कामांसाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT