Dhiraj Deshmukh
Dhiraj Deshmukh sarkarnama
पुणे

विलासराव आज असते तर, या भाजप आमदाराच्या प्रश्नावर धीरज देशमुख म्हणाले...

Mangesh Mahale

पुणे : महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) काँग्रेसचे (Congress) आमदार नाराज असल्याची चर्चा अधूनमधून सुरु असते. आघाडीत सारे काही आलबेल नाही, असे विरोधक म्हणत असतात. अशातच कॉंग्रेसचे आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी आघाडी बाबत विधान केलं अन् उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले. निमित्त होत एका अराजकीय कार्यक्रमाचं. (Sarkarnama Open Mic Challenge)

राजकारणापलीकडे जाऊन रंगलेला 'राजकीय सामना'नुकताच सकाळ डिजिटलतर्फे 'Sarkarnama Open Mic Challenge' या कार्यक्रमात पाहायला मिळाला. कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी अराजकीय गप्पा मारल्या, अराजकीय प्रश्नांना उत्तर दिले. राज्यातील तरुण नेत्यांच्या मनातील महाराष्ट्र काय आहे, पत्रकारांच्या भूमिकेतून नेत्यांनीच नेत्यांना विचारलेले तिखट प्रश्न अन् त्याला मिळालेले हजरजबाबी उत्तर यामुळे हा कार्यक्रम रंगत गेला.

'सरकारनामा हिट वेव्ह,' 'सरकारनामा फेस ऑफ' या रंगतदार कार्यक्रमात उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel), काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) व भाजपचे आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी सहभाग घेतला. यावेळी "राज्यात शिवसेनेशिवाय आघाडी झाली असती," असे एका प्रश्नाला उत्तर देताना धीरज देशमुख म्हणाले

"विलासराव देशमुखांनंतर मोठी जबाबदारी अमित देशमुख यांच्यावर होती, त्यानंतर तुमचा भाऊ अभिनेता रितेश देशमुख हे त्यांच्या क्षेत्रात उत्तम आहेत. अशा दोघांमध्ये आपण स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आपला मार्ग कसा प्रशस्त केला," या श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना धीरज म्हणाले, "राजकारणात येण्याचा विचार लहानपणापासून माझा नव्हता. व्यवसाय करावा, अशी इच्छा होती. मला लोकांनी स्वीकारल्यामुळे मी राजकारणात ओढला गेलो. लोकांनीही प्रतिसाद दिला की तुम्ही काहीतरी करु शकता. 'तुमच्यामध्ये आम्ही ती क्षमता पाहतो'असे लोकांचे मत होते. माझ्यातील ती क्षमता आहे का, ती एकदा टेस्ट करुन पाहावी, म्हणून हा प्रवास सुरु झाला. आतापर्यंत चांगलं चाललयं,"

"विलासराव देशमुख यांच्यातील असा एक गुण होता की तो गुण तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतः आत्मसात करु शकणार नाही, दुसरा असा एक गुण जो राजकारणात येताना तुम्ही पहिल्यापासूनच आत्मसात केला आहे," असा प्रश्न आदिती तटकरे यांनी धीरज देशमुख यांना केला. त्यावर धीरज देशमुख म्हणाले,"त्यांचा सर्वात अवघड स्वभाव होता, ते शांत आणि संयमी होते, त्यांना राग येत नव्हता,पण हे आजच्या पीढीला सहज जमेल असं वाटत नाही, दुसरं त्याच्याकडून शिकण्यासारखं म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. 'राजकारणात काम करीत असताना डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर ठेवून काम करावं लागते,' ही शिकवण मला त्यांच्याकडून मिळाली,"

"जिनिलिया डिसुल्झा ही अभिनेत्री म्हणून चांगली आहे की भावाची बायको म्हणून चांगली आहे," असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी केला. धीरज देशमुख म्हणाले, 'माझी वहिनी म्हणून ती सर्वात चांगली आहे,"

"विलासराव देशमुख हे शिवसेना, भाजपविरोधी होते. आज जर विलासराव असते तर ती महाविकास आघाडी अस्तिवात आली असती का," असा प्रश्न आमदार परिणय फुके यांनी केला. यावर धीरज देशमुख म्हणाले,"विलासराव असते तर महाविकास आघाडी अस्तिवात आली असती, किंबहुना आम्हाला असं कधी वाटतं सत्ता ही आघाडीचीच (काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीची) आली असती." शिवसेनेची गरज सत्ता स्थापायला पडली नसती, असे धीरज यांच्या उत्तरातून सूचित होताच साहजिकच त्यावर हशा आणि टाळ्या पडल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT