chandrakant patil-hasan Mushrif
chandrakant patil-hasan Mushrif Sarkarnama
पुणे

पवारच पाठीशी नसल्यामुळे मुश्रीफांची तब्येत बिघडली असावी

Vijaykumar Dudhale

पुणे : मला जेवढे शरद पवार माहिती आहेत. (मी जरी त्यांच्यावर टिकाटिप्पणी करत असलो तरी मी मेरीटवर टीका करतो. मी कधी शब्द चुकलो नाही.) त्यावरून पवार हे अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीला पाठीशी घालणार नाहीत. पवारांनी भेटीवेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांना सांगितले असेल की ऑन पेपर दिसतंय की तुम्ही कोलकत्त्यावरून एन्ट्री आणलेल्या आहेत. त्यामध्ये मी काहीही करू शकत नाही. शरद पवारच आपल्या पाठीशी राहणार नसतील तर काय, यामुळेच मुश्रीफांची तब्येत बिघडली असावी. पवार अशा प्रकारच्या चुकींच्या गोष्टींच्या मागे उभे राहणार नाहीत. पवारांनी फार मोठे राजकारण केले आहे. पण ते अशा प्रकारच्या चिल्लर विषयात कधी पडले नाहीत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. (... So Hasan Mushrif's health must have deteriorated : Chandrakant Patil)

पुण्यातील पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. त्यावेळी त्यांनी खास करून हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल चढविला. ते म्हणाले की, कायद्याची लढाई कायद्याने लढा. कायद्याची लढाई कोल्हापुरी चप्पलेने लढू नका. कोल्हापूरी चप्पल दाखवणं सोपं आहे. पण, ईडीला तोंड देणे कठीण आहे. तोंडाला फेस येईल. तुमच्या कारखान्यात ९८ कोटी कोठून आले आहेत. त्या कंपन्या कुठे आहेत. कोलकत्ताच्या कंपन्यांनी कोल्हापूरच्या सेनापती घोरपडे कारखान्यात कशी काय गुंतवणूक केली, याची उत्तरे मुश्रीफ यांनी द्यावीत. मुश्रीफांनी पॅनिक होऊ नये, शांत राहून काम करावे, असा सल्लाही पाटील यांनी यावेळी दिला.

पश्चिम महाराष्ट्रातून भाजप हद्दपार झाला आहे. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे फक्त कोल्हापूर नाही. सोलापूर जिल्ह्यात आठ आमदार आणि दोन खासदार भाजपचे आहेत. युती असताना कोल्हापूरचे दोन्ही खासदार युतीचे झाले आहेत. शून्य आमदार असलेल्या सातारा जिल्ह्यात आता दोन आमदार झाले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. सांगली महापालिकेतील भाजपची सत्ता दगाफटक्याने गेली. पण स्थायी समिती आमच्याकडे आहे. तसेच, सांगली जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा जिल्हा परिषद आमच्याकडे होती. मात्र, महाआघाडीमुळे ती गेली. मागच्या पंचवार्षिकमध्ये कोल्हापुरात भाजप-शिवसेना युतीचे आठ आमदार होते, त्यावेळी तुमचे दोन आणि काँग्रेसचे शून्य आमदार होते. त्यामुळे राजकारणात कोणी शेखी मिरवयाची नसते. चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर भाजपचा पश्चिम महाराष्ट्रात धुव्वा उडाला, असा आरोप करण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

हसन मुश्रीफांना माझे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. एक गोळीही न घेता त्यांना झोप लागत असेल तर त्यांचे पैसे वाचविणे एक मित्र म्हणून माझे कर्तव्य आहे. त्यामुळे माझे नाव घ्यायला, त्यांना पूर्ण परवानगी आहे. माझ्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करायला परवानगी आहे. बांधकाम विभाग आणि महसूल खात्यात घोटाळा झाला असे सांगत असतील तर तुम्ही ते बाहेर काढा. पण, माझा एकच सांगणं आहे की कायद्याची लढाई कायद्याने लढा. गुद्यावर येऊ नका, असा सल्ला द्यायला ते विसरले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT