Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
पुणे

गडकरींकडून होणाऱ्या रस्त्यांच्या कामात सोलापूर जिल्हा राज्यात नंबर वन !

सरकारनामा ब्यूरो

पुणे : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक विभागाकडून राज्यात सर्वाधिक रस्त्यांचे बांधकाम सोलापूर जिल्ह्यात होत आहे. यासाठी तब्बल ६० हजार कोटी रूपये खर्च करण्यात येत आहेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री निती गडकरी यांनी सांगितले. अजूनही जिल्ह्यातील खासदार-आमदारांकडून नव्या कामांचे प्रस्ताव येत आहेत. त्यामुळे हा आकडा एक लाख कोटीपर्यंत जाऊ शकतो, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील पूर्ण झालेल्या रस्त्यांचे लोकार्पण व नव्या रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी गडकरी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘ जिल्ह्यात आजपर्यंत सुरू असलेल्या कामांवर १७ हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. आणखी वीस हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. एकूण विचार केला तर सोलापूर जिल्ह्यात गेल्या सात वर्षात रस्त्यांच्या कामासाठी जवळपास ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यातील काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे अद्याप सुरू आहेत.’’

गडकरी म्हणाले, ‘‘ दिलेला शब्द मी पाळतो. त्यामुळे जी कामे स्वीकारली आहेत ती पूर्ण करणारच. रस्त्यांमुळे कोणत्याही भागाचा अधिक जलद गतीने विकास होतो हे अनेक विकसित राष्ट्रांच्या उदाहरणांवरून स्पष्ट होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. पालखी मार्गाचे कामही सुरू करण्यात आले आहे. सोलापूर ते सांगली हा रस्ता उत्तमरित्या पूर्ण झाला असून या दोन शहरातील अंतर आता केवळ तीन तासात पूर्ण करता येणे शक्य आहे. सोलापूर जिल्हा पूर्वी दुष्काळी जिल्हा समजला जात होता. सांगोला तालुक्याची अवस्था तर फारच भीषण होती. कायमस्वरूपी दुष्काळी तालुका अशी या तालुक्याची ओळख होती. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख विधिमंडळातील ज्येष्ठ आमदार होते. त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. सांगोला तालुक्यासाठी ताकारी-म्हैसाळ पाणी योजना, टेंभू पाणी योजनेतून पाणी मिळावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. जलशक्ती मंत्रालयायाचा कारभार माझ्याकडे असताना सात हजार कोटी रुपयांचा निधी दिला त्यामुळे या भागात पाणी येऊ शकले. गेल्या महिन्यात सांगली दौऱ्यावर असताना त्या भागात नदीत पाणी आल्याचे पाहून खूप समाधान वाटले.’’

एके काळी दुष्काळी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात उसाचे उत्पादन प्रचंड मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, ऊस आणि त्यापासून निर्माण होणारी साखर यावरच आपण अवलंबून राहिलो तर एक दिवस ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल, हे मी खात्रीने सांगतो. हे टाळायचे असेल तर केवळ साखर उत्पादन न करता उपपदार्थांची निर्मिती करण्याकडे साखर कारखानदारांनी लक्ष देण्याची गरज आहे. इथेनॉलची निर्मिती हीच साखर कारखान्यांना यापुढच्या अधिक सक्षम ठेवू शकते, असा मला विश्वास वाटतो. यापुढील काळात इथेनॉल, बायोडिजल, इलेक्ट्रिक हेच आपले भविष्य असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे साखर कारखानाधारांनी भविष्याचा वेध घेऊन या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT