Uddhav Thackeray
Uddhav Thackeray  sarkarnama
पुणे

Shiv Sena : गणेशोत्सवात भक्तिभावापेक्षा राजकीय भावच जास्त ; शिवसेनेचा सरकारवर हल्लाबोल

सरकारनामा ब्युरो

पुणे : कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनंतर यंदा जल्लोषात गणेश उत्सवास (Ganesh Chaturthi Utsav)सुरुवात झाली आहे. राज्यात गणेश उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जात आहे. काल माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे (shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये सहकुटुंब अनेक गणेश मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेतले.

ठाकरेंनी बाप्पाकडे प्रार्थना केली आहे. आज 'सामना'मधून भाजपवर जोरदार कागदी बाण सोडण्यात आले आहेत. "हे सर्व राज्य सरकारने गणेशोत्सव ‘बंधमुक्त केल्याने घडत आहे, अशी टिमकी काही मंडळी वाजवत असली तरी त्यात भक्तिभावापेक्षा राजकीय भावच जास्त आहे, हे राज्यातील गणेशभक्तही ओळखून आहेत," अशा शब्दात विरोधकांना टोला लगावला आहे.

"आता कोरोनाचे संकट पूर्णपणे संपलेले नसले तरी लसीकरणामुळे त्याचे मळभ कमी झाले आहे. त्यामुळे साहजिकच गणेशोत्सवाचा उत्साह वाढला व गणरायाच्या आगमनाच्या जल्लोषी मिरवणुकांतही त्याचे प्रतिबिंब उमटले.

गणरायाच्या आगमनासोबतच गौरीच्या स्वागताचीही जय्यत तयारी सर्वत्र झाली आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. पुढील दहा दिवस महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत हाच उत्साह आणि चैतन्य दिसणार आहे. वातावरण श्रद्धेने भारलेले असणार आहे," असे अग्रलेखात नमूद केले आहे.

देशातील लोकशाही, उच्च संसदीय परंपरा, स्वातंत्र्य, घटनात्मक अधिकार, संविधानाची चौकट, धार्मिक एकोपा, राजकीय विरोधक अशा सगळ्यांचेच श्वास’ सरकारी दडपशाहीमुळे कोंडले गेले आहेत. तिकडे देशातील सामान्य माणूस तरी ‘मोकळा’ कुठे आहे?, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

'गणराया, तू सुखकर्ता आणि विघ्नहर्ता आहेस. लोकशाही आणि घटनेने बहाल केलेले ‘मुक्त आणि निर्भय वातावरण’ निरंकुश सत्तालालसेच्या तावडीत सापडल्याने गुदमरले आहे. गणराया, देश ‘निर्भय’ कर, एवढीच प्रार्थना आज देशातील जनता तुला करीत आहे. तिचा स्वीकार कर,' असा टोमणा शिवसेनेने लगावला आहे.

'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे की...

  • राज्यातील आणि देशातील सत्ताधारी हिंदू सण ‘मोकळे केल्याचे ढोल बडवले जात असले तरी प्रत्यक्षात देशातील वातावरण खरोखरच ‘मोकळे’ राहिले आहे काय?

  • विरोधी पक्ष, नेते, सरकारचे टीकाकार यांची सत्ताधिकार आणि तपास यंत्रणांच्या माध्यमातून मुस्कटदाबी केली जात आहे. राज्या-राज्यांतील बिगर भाजप सरकारे शक्य होईल त्या मार्गाने बरखास्त केली जात आहेत.

  • प्रादेशिक पक्षांचे तर नामोनिशाण संपवून टाकण्याची भाषा केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष करीत आहेत.

  • एकीकडे महागाईचा फास आणि दुसरीकडे सरकारी दडपशाहीचा गळफास या कोंडीत देशाचा श्वास कोंडला आहे.

  • कोरोनाचे संकट बऱ्यापैकी निवळले असले तरी दडपशाहीचे संकट कायमच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT