Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar,Mahayuti sarkarnama
पुणे

Thackeray group: लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाहीत, आता विधानसभेच्या तोंडावर गायींना मंचावर आणलं!

सरकारनामा ब्यूरो

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकार विविध योजना जाहीर करीत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता देशी गायीला 'राज्यमाता-गोमाता'घोषित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय जाहीर करण्यात आल्याने यावर राजकारण सुरू झाले आहे. आगामी निवडणुकांमध्ये राजकीय फायदा घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं टीका विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून 'राज्यमाता-गोमाता' वरुन शिंदे सरकार, भाजपवर टीकास्त्र डागले आहे. लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाहीत. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गायींना मंचावर आणले आहे, अशी गंभीर टीका 'सामना'च्या अग्रलेखात करण्यात आली आहे.

गाय ही बैलांची माता आहे, पण सरकारचे बापजादे बैल असल्यानेच निवडणुकीसाठी आता गाय आणली आहे. लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाहीत. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गायींना मंचावर आणले आहे. अर्थात, त्यांनी काहीही केले तरी लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही राज्यातील जनता या सरकारला गोठ्यात ढकलणार हे निश्चित आहे. तरीही लोकहो सावधान, गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय हे गायींच्या नावाने दंगली घडविण्याचे कारस्थान असू शकते, अशी भीती अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

गायींना नुसते ‘राज्यमाता’ वगैरे म्हणण्यापेक्षा सरकारने म्हाताऱ्या भाकड गायी शेतकऱ्यांकडून विकत घेतल्या पाहिजेत व राज्याच्या पशुसंवर्धन खात्याने या भाकड गायींसाठी मरेपर्यंत विशेष व्यवस्था करायला हवी. ‘राज्यमातां’चा भार शेतकऱ्यांवर टाकू नका. आधीच शेतकऱ्यांची अवस्था भाकड गायी, बैलांप्रमाणे झाली आहे. अशा वेळी शेतकरी भाकड गायींचे पालनपोषण करणार तरी कसे? त्याबाबत काही उपाय करण्याऐवजी राज्यकर्ते गायींना ‘राज्यमाता’ वगैरे दर्जा देऊन जुमलेबाजी करण्यात मग्न आहेत, असे अग्रलेखात नमूद केले आहे.

काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात

  1. गोमांस बाळगण्याच्या आरोपांवरून एका बाजूने माथेफिरू टोळक्यांनी मुसलमानांवर हल्ले करायचे, त्याच वेळेला त्यांच्याच सरकारने आणि पक्षाने गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून निवडणुकीसाठी निधी घ्यायचा असे प्रकार मोदी राजवटीत नेहमीच घडत आले आहेत.

  2. गायींचे संवर्धन हा विषय कृषी व माणसाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. गायींना वैदिक काळापासून माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. आयुर्वेदातही गायीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, पण महाराष्ट्रासह देशातील

  3. गोशाळांची अवस्था नेमकी काय आहे? त्यांचे संवर्धन, चारापाणी नीट होते काय? गोमाता म्हणायचे व गायींनी चारापाण्याशिवाय तडफडायचे असे सध्याचे चित्र आहे. मुळात देशी गायी कमी दूध देतात व या गायींच्या दुधाला भाव नाही. त्यामुळे देशी गायी शेतकरी कुटुंबाला परवडत नाहीत.

  4. भारताच्या दुग्ध विकासात व त्याबाबतच्या अर्थव्यवस्थेत या प्राण्यांना महत्त्व आहे. आता गायी म्हाताऱ्या होतात, त्या दूध देत नाहीत, शेतकरी त्यांचे पालनपोषण करू शकत नाहीत, अशा भाकड गायींचे करायचे काय? या प्रश्नाचे उत्तर सरकारकडे नाही. गोवंशहत्या नाही हे धोरण ठीक, पण ते देशभरात लागू नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT