Chinchwad By-Election
Chinchwad By-Election Sarkarnama
पुणे

Chinchwad By-Election : 'सोडून गेलेले सटरफटर, शिवसेना स्थापनेत त्यांचा काडीचाही संबंध नाही'; अजित पवारांनी डिवचलंं...

उत्तम कुटे: सरकारनामा

Chinchwad By-Election News: ''शिवाजी पार्कला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की, आता माझं वय झालयं. आता इथुन पुढे शिवसेना प्रमुखाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळतील, असं सांगितलं होतं. मी टिव्हीवर ही सभा बघत होतो. आदित्य ठाकरेही तिथे होते. आता युवा नेतृत्त्व म्हणून आदित्य ठाकरे काम करतील, असंही बाळासाहेबांनी सांगितलं होतं.

मग हे सर्व बाळासाहेबांनी सांगितलं असताना हे सटरफटर मध्येच काय सांगायला लागले, असा खोचक टोला विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला आहे. उद्या निवडणुका लागल्यावर बघा यांची काय अवस्था होते. या सटरफटर आमदार व खासदारांचा शिवसेना स्थापनेत काडीचाही सबंध नाही. असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करण्याचा बदला कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत घ्यायचा आहे,असे आव्हान अजित पवार यांनी यावेळी केले.चिंचवडमध्ये बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या राहूल कलाटेंवर नाव न घेता त्यांनी शरसंधान केले. मागील वेळी (२०१९) लाखावर मते पडल्याचा गवगवा करणाऱ्यांची (कलाटे) ही मते शिवसैनिकांची होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता, म्हणून तेवढी मते पडली होती, असे त्यांनी सुनावले.

चिंचवडमधील शिवसेना बंडखोराचा बोलवता धनी वेगळा असून ही निवडणूक सोपी जावी म्हणून हे बंड असल्याचा दावा त्यांनी केला.त्यांच्यामागे कितीजण आहेत, हे त्यांनाही कळू द्या,असे आवाहन त्यांनी केले. गद्दारांना धडा शिकविण्यासाठी ही निवडणूक महत्वाची असल्याचे दाखवून द्यायचे आहे,असे ते म्हणाले.त्यासाठी एकजूट ठेवा,गाफील राहू नका, रुसू नका, फुगू नका, नाराज होऊ नका असे आवाहन त्यांनी केले.कारण रात्र नाही,तर दिवसही वैऱ्याचा आहे,असे त्यांनी सांगितले.चिंचवडच्या विजयासाठी आता आपली सटकलीच पाहिजे,असे ते म्हणाले.

महागाई आणि बेरोजगारीवरील लक्ष हटविण्यासाठी भाजपकडून सध्या धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण केली जात असून आपल्याला,मात्र जातीय सलोखा कायम ठेवायचा आहे,असे अजित पवार म्हणाले.गेल्या सात महिन्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करताना या कालावधीत बेरोजगारी वाढली,उद्योग राज्याबाहेर गेले, पूर्वी नसलेल्या कोयता गॅंग निर्माण झाल्या, आमदारांवर हल्ले होऊ लागले, पत्रकाराचे खून होऊ लागले, एकूणच कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचे त्यांनी सांगितले. कारण पोलिसांच्या कामात सध्या सुरु असलेल्या हस्तक्षेपामुळे त्यांची जरबच कमी झाली आहे,असे अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT