Gaurakshak Racket Alleged by Sadabhau Khot : गोरक्षकांच्या नावाखाली देशभरात गुंडगिरीला ऊत आला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुरुंग लावण्याबरोबर लोकांचे जीव घेण्यापर्यंत यांची मजल पोहोचली आहे. हिंसाचारात आघाडीवर असलेल्या या कथित गोरक्षकांच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रशासनाला गोरक्षकांवर नियंत्रण आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता आमदार आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी या गोरक्षकांच्या वर्मी घाव घातला आहे. बड्या शहरांमध्ये थार गाड्यांमधून फिरताना कॉर्पोरेट कार्यालय थाटून यांचं रॅकेट सुरु असल्याचा गंभीर आरोप खोत यांनी केला आहे.
पुण्यातील एका प्रकरणामध्ये कथित गोरक्षकांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सदाभाऊ खोत हे सिंहगड पोलीस स्टेशनला आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सदाभाऊ म्हणाले, राज्यातील काही गोशाळा देशी गाईंसाठी सेवाभावी वृत्तीनं काम करत आहेत. मात्र, काही गोशाळांचं आणि गाडी अडवणाऱ्या कथाकथित गोरक्षकांमध्ये संगनमत आहे. त्यामुळं गोशाळांमध्ये किती जनावरं पाठवण्यात आली? सध्या तिथं किती जनावरं आहेत? याची राज्य सरकारनं चौकशी करावी अशी आमची मागणी आहे.
गाई, म्हशी यांचं शेण, दूध आमची माय, बहीण, बाप काढतो आणि हे गोरक्षक म्हणणारे मोठ्यमोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमधून धंदा करत आहेत. मुख्यमंत्र्यांशी याबाबत मी बोलणार आहे. शेतकऱ्यांचा व्यवसाय आशानं मरून जाईल, गुरांना घेऊन जाणाऱ्या गाड्या अडवल्या जातात शेतकऱ्यांना मारलं जातं त्यामुळं अशा कथित गोरक्षखांवर कारवाई करा, अशी आग्रही मागणी यावेळी सदाभाऊ खोत यांनी केली. थार सारख्या गाड्यांमधून काही लोक पुण्या-मुंबईवरून येतात आणि आम्ही गोरक्षणाचा काम करत असल्याचं सांगतात. गोरे-गोमटे हट्टे-कट्टे लोक गोरक्षकामध्ये कुठून आले हेच आम्हाला कळत नाही. मुंबईसारख्या शहरातील फ्लॅटमध्ये कुत्री, मांजरं बघायला मिळथात मग त्यांच्याकडं गाई-गोठे कुठून आले? हे गोरक्षक देखील या ठिकाणी कसे? याचा प्रश्न पडला असल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले.
राजस्थान इतर राज्यातून दूध देणाऱ्या गाई आणल्या जातात तेव्हा या कथाकथित गोरक्षकाकडून अशा गाड्या अडवल्या गेल्या तर गाई येणार नाहीत. शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान होईल शेतकरी भरडला जाईल, सरकार जरी आमचं असलं तरी मी शेतकरी नेता आहे. त्यामुळं या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी कथित गोरक्षकांना ठणकावून सांगितलं.
गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू आहे. यांचे पुणे, कोल्हापूर, सांगली, मुंबई यांसारख्या ठिकाणी कॉर्पोरेट ऑफिस आहेत. या माध्यमातून वेगळेच गैरप्रकार सुरू आहेत, त्याचा त्रास मात्र शेतकऱ्यांना होत आहे. सरकारनं याबाबत कारवाई केली नाही तर पोलीस स्टेशन समोर आम्ही जनावराच्या छावण्या उभ्या करू असा इशारा यावेळी सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.