Ajit Pawar and Eknath Shinde Latest News
Ajit Pawar and Eknath Shinde Latest News Sarkarnama
पुणे

'वेदांता' प्रकल्प राजकीय दबावातून गुजरातला; अजितदादांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यासाठी महत्वाचा असणारा 'वेदांता' ग्रुपचा प्रकल्प ('Vedanta' project) हा राज्याबाहेर म्हणजे गुजरातला नेण्याच्या हालचालीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे.

महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर यामुळे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. त्यामुळे राज्याच्या हितासाठी राज्य सरकारने याबाबत तातडीने हस्तक्षेप करून राज्याबाहेर जाणारी गुंतवणुक थांबवत हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करावा,अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. (Ajit Pawar and Eknath Shinde Latest News)

राज्यासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे. हा प्रकल्प तळेगाव एमआयडीसीत येणार होता. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने प्रयत्नही करण्यात आलेले. तसेच त्यादृष्टीने या प्रकल्पासाठी सर्व पुर्तताही करण्यात आल्या होत्या. मात्र दोन लाख कोटींची गुंतवणुक असणारा आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा महत्वपूर्ण प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यामुळे पवारांनी तत्काळ मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेत हा या प्रकल्पासाठी प्रयत्न करा, अशी मागणी केली.

पवार यांनी मुंबईतील 'सह्याद्री' अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. पवार म्हणाले, 'वेदांता' ग्रुप व तैवॉन येथील फॉक्सकॉन या कंपनीचे 60 : 40 असे जॉईन्ट व्हेंचर असणारा आणि महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण असणारा सेमीकंडक्टर व डीस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातला जाण्याच्या वाटेवर असून या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणुक राज्यात होणार होती. यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात विशेष प्रयत्न करण्यात आले होते. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध होणार होता.

हा प्रकल्पाच्या उभारणीसाठी कंपनीकडून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा, गुजरात व आंध्र प्रदेश या राज्याबरोबर चर्चा करण्यात आली होती. मात्र या कंपनीने महाराष्ट्राला प्रथम पसंती दिली होती आणि तसा अहवालही कंपनीने तयार केला होता. तसेच त्याबद्दल महाविकास आघाडी सरकार असताना उद्योग विभागाशी बोलणी सुद्धा झाली होती. याबरोबर प्रकल्पाची जागा निवडीसाठी एकुण 100 मुद्दांचा विचार करून 'वेदांत' ग्रुपकडून तळेगांवातील टप्पा 4 ही जागाही अंतिम करण्यात आले होती. तसेच तळेगांवातील कंपनीच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ॲटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, जेएनपीटी बंदराशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्याने या कंपनीने तळेगांवात एक हजार एकर जागेची निवडही केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान सत्तांतर होताच महाराष्ट्राच्या हिताचा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जात असून राज्याची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे राज्याला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न दिसत असून राज्याच्या ‘जीएसटी’चे देखील मोठे नुकसान होणार असल्याचे पवारांनी म्हटले आहे. गुजरातेतील धोलेरा येथे हा प्रकल्प प्रस्तावित केला असून महाराष्ट्रातील तळेगांवच्या तुलनेत ही जागा प्रकल्पाच्या उभारणीसाठी सामान्य. मात्र गुजरातचे मुख्यमंत्री आणि 'वेदांत'चे प्रमुख हे सांमजस्य करार करणार आहेत, असे कळते. महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून, अशा प्रकारची गुंतवणुक महाराष्ट्रात थांबण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलावीत आणि हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणावा, अशी मागणी पवारांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT