Vijay Wadettiwar News Sarkarnama
पुणे

Vijay Wadettiwar News : जनरल मोटर्स बंद करण्यासाठी खाडेंना किती मलिदा मिळाला ? वडेट्टीवारांचा सवाल

उत्तम कुटे

Pune : तळेगाव (ता. मावळ) एमआयडीसीतील जनरल मोटर्स ही कंपनी दोन वर्षांपूर्वी व्यवस्थापनाने बंद केल्याने तेथील साडेतीन हजार कामगार बेकार झाले आहेत. ही कंपनी ह्युंदाई मोटर्सला विकण्यात आली. पण त्यांनी जुन्या कामगारांना कामावर घेतले नाही. त्यामुळे त्यांनी कुटुंबासह गांधी जयंतीपासून (ता. २) तळेगाव एमआयडीसीच्या प्रवेशद्वारावर साखळी उपोषण सुरू केले आहे. ही कंपनी बंद करण्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय व़डेट्टीवार यांनी कामगारमंत्री सुरेश खाडेंवर ही कंपनी बंद करण्यासाठी किती मलिदा मिळाला, असा थेट भ्रष्टाचाराचा आरोप आज केला.

सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांनी जनरल मोटर्स कामगारांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे, तर स्थानिक आमदार राष्ट्रवादीचे (अजित पवार) सुनील शेळके यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारला उद्यापर्यंतची (ता. ११) मुदत दिली आहे, अन्यथा तळेगाव एमआयडीसी बंदचा इशारा त्यांनी दिला आहे. एकूणच हा रागरंग लक्षात घेऊन सरकारने आता याप्रश्नी पावले उचलण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी शेळके मुंबईला गेले आहेत. त्यामुळे लवकरच काही तरी तोडगा निघेल, असे संकेत आज मिळाले. त्यामुळे कामगारांचे आंदोलन यशस्वी होणार, अशी चिन्हे दिसत आहेत.

नव्या कंपनीत घेण्याची मागणी

आघाडी सरकारच्या काळात जनरल मोटर्स कंपनी विकण्यात आली. त्यावेळचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २१ डिसेंबर २०२० रोजी पत्र लिहून जनरल मोटर्सच्या कामगारांना नव्या कंपनीत घेण्याची मागणी केली होती. राज्यात सत्ताबदल झाला. युतीचे सरकार आले. फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्या सरकारने जनरल मोटर्स कंपनी बंद करण्याची परवानगी दिली. त्यावरून राज्य सरकार व त्यातही त्यांच्या कामगारमंत्र्य़ावर वडेट्टीवारांनी आज गंभीर आरोप केले. भ्रष्टाचाराची तोफ डागली.

खाडेंचा हा निर्णय बेकायदेशीर

सत्तेत आल्यावर कामगारमंत्री सुरेश खाडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फडणवीसांच्या पत्राची दखल घेतली नाही. उलट कामगारांच्या भावना न जाणून घेता कंपनी क्लोजरची परवानगी दिली, याकडे वडेट्टीवारांनी लक्ष वेधले. खाडेंचा हा निर्णय बेकायदेशीर असून, साडेतीन हजार कामगारांना बेकार करून कंपनीच्या हिताचा निर्णय का घेतला? त्यांना कुणाचा फोन आला? किती मलिदा मिळाला? आरोपांच्या फैरी त्यांनी झाडल्या. अशा सत्ताधारी नेत्यांना थोडी, तरी लाज वाटली पाहिजे, की एवढे कामगार उद्ध्वस्त होत असताना त्यांच्यातील एकही नेता आठ दिवसांनंतरही कामगारांच्या बाजूने आज उभा नाही, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT