Sharad Pawar-Dilip Walse Patil
Sharad Pawar-Dilip Walse Patil Sarkarnama
पुणे

Walse Patil Clarification on Pawar : शरद पवारांबाबतच्या 'त्या' विधानावर वळसे पाटलांची दिलगिरी; ‘पवारसाहेबांबद्दल चुकीचा शब्द जाणे कदापि शक्य नाही’

डी. के. वळसे पाटील

Manchar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मी चुकीचे काही बोललो नाही. तसेच, त्यांच्यावर टीकाही केलेली नाही. माझ्या तोंडी शरद पवार यांच्याबद्दल चुकीचा शब्द जाणे कदापि शक्य नाही. तरीही कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्या संदर्भाने केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. (Walse Patil's apology for that statement about Sharad Pawar)

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे रविवारी (ता. २० ऑगस्ट) सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला होता. त्या मेळाव्यात त्यांनी शरद पवार यांच्याबद्दल बोलले होते. त्यावर सहकार मंत्री वळसे पाटील यांनी आज दिलगिरी व्यक्त केली आहे.

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, शरद पवार यांच्याबद्दल मी चुकीचे बोललो नाही अथवा टीका केलेली नाही. त्यांनी गेली ३५ ते ४० वर्षे महाराष्ट्राच्या हितासाठी केलेली कामगिरी फार मोठी आहे. पण, त्या तुलनेत राज्यातील जनता त्यांच्यामागे ज्या खंबीरपणे उभी राहायला पाहिजे होती. जो पाठिंबा मिळायला पाहिजे होता, तो पाठिंबा मिळालेला नाही, अशी खंत मी बोलून दाखवली होती.

इतर राज्यांत प्रादेशिक पक्षांना बहुमत का मिळते. हे भाषणाच्या ओघात राजकीय विश्लेषण करत होतो. जनता व कार्यकर्ते यांच्यासमोर भूमिका मांडत होतो. पूर्ण भाषण तपासून पहा व ऐका. मी शरद पवार यांच्याबद्दल आदरच व्यक्त केला आहे व यापुढे करत राहणार आहे. त्यांच्यामुळेच मी ३२ वर्षे आमदार व अनेकदा मंत्री झालो आहे. राज्यातील जनतेने त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहायला पाहिजे होते, ही खंत मी बोलून दाखविली. मी कालच बोललो असे नाही तर ही भूमिका मी पक्षाच्या व्यासपीठावरही मांडलेली आहे.

माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घेतलेला नाही, अशी खंत व्यक्त करून वळसे पाटील म्हणाले की, ज्यावेळेस मला संधी मिळेल, त्यावेळी शरद पवार यांना भेटून याबाबतची वस्तुस्थिती मी त्यांना सांगणार आहे. आंबेगावमध्ये शरद पवार आले, तर त्यांचे पूर्वीप्रमाणेच कार्यकर्ते जंगी स्वागत करतील.

काय म्हणाले होते वळसे पाटील?

शरद पवार यांच्या उंचीइतका नेता देशात नाही, असे आपण म्हणतो. दुसऱ्या बाजूला पवारसाहेबांच्या ताकदीवर किंवा नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेने त्यांना एकदाही बहुमत दिलं नाही. एकदाही त्यांना स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्री केलं नाही, असे विधान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचरच्या मेळाव्यात केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT