Kasba By- Election:
Kasba By- Election: Facebook @ Ravindra Dhangekar
पुणे

Kasba By- Election: कसब्यातील पराभावाचं खापर भाजपने कुणावर फोडलं?

ब्रिजमोहन पाटील : सरकारनामा ब्यूरो

Kasba By-Election : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर रविवारी (५ मार्च) मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची व बूथ प्रमुखांची चिंतन बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीदरम्यान, भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर, नगरसेवकांच्या निष्क्रीयतेवर आणि बूथ प्रमख, शक्ती केंद्र प्रमुखांशी योग्य पद्धतीने संवाद न साधला जात नसल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत यात सुधारणा होणे आवश्‍यक असल्याचे भाजप नेते हेमंत रासने यांनी सांगितलं. तसचं घरोघरी जाऊन मतदारांना आभाराचे पत्रक देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी हेमंत रासने, माजी सभागृहनेते सुहास कुलकर्णी, विधानसभा अध्यक्ष प्रमोद कोंढरे, बाळा शुल्का, मामा देशमुख यांनी त्यांची मते मांडली. या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम केले, त्यांच्या प्रयत्नांमध्ये कुठलीही कमतरता राहिली नाही, अशा शब्दातं सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. पण आपला पराभव का झाला याचे प्रत्येकाने आत्मचिंतन करायला हवे, अशी सूचनाही त्यांना देण्यात आली.

निवडणुकीत कार्यकर्त्यांनी सक्षमपणे कामे केली. पण बाहेरची यंत्रणा कामाला लावण्यात आली होती. अनेक पदाधिकारी मतदारसंघात तळागाळात काम न करता फक्त गाड्यांमधून फिरायचे. नगरसेवकांनी पाच वर्षात जनतेची व्यवस्थित कामे केली असती, त्यांच्याशी संपर्क ठेवला असता तर नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असता, पण हे नगरसेवक पाच वर्ष गाडीच्या काचा वर करूनच प्रभागात फिरले. त्यामुळे निवडणुकीत मतदारांची नाराजी दिसून आली.

प्रभाग १५ मध्ये गांभीर्याने काम न केल्याच्या फटका बसला. पक्ष संघटनेत काम करताना पदाधिकाऱ्यांनी बूथ प्रमुखांशी प्रेमाने, संयमाने बोलले पाहिजे, पण अनेक जण बोलत नाहीत. तळागाळातील कार्यकर्त्यांशी चांगला संवाद असेल तरच पक्षाची ध्येय धोरणे नागरिकांपर्यंत पोहचवता येतात, असे मतही पदाधिकाऱ्यांनी सागितलं. असे बैठकीत सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

अभाविपवर पराभवाचं खापर

दरम्यान, कसब्याची निवडणूक दरवेळी भाजपच्या यंत्रणेच्या हातात असते, पण यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक ताब्यात घेतल्यामुळे निवडणुकीत पराभव झाला, असेही मत एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले.

‘‘या निवडणुकीत सर्वांनी जीव तोडून काम केले. पण भाजप विरुद्ध सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याने ही हा पराभव झाला. यापुढे या मतदारसंघात हिरवा रंग उधळला जाऊ नये यासाठी सर्वांनीच पुन्हा एकदा मन लावून कामे करा असे कार्यकर्त्यांनी सांगण्यात आले आहे. पुढील काही दिवसात घरोघरी जाऊन मतदारांना आभाराचे पत्र दिले जाणार आहे. पुढच्या निवडणुकीत भाजपचा कसब्यात दणदणीत मतांनी विजय होईल. असा विश्वास यावेळी हेमंत रासने यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT