Devendra Fadnavis, Girish Bapat
Devendra Fadnavis, Girish Bapat Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis on Girish Bapat : मुख्यमंत्री असतांना भाऊंमुळे मी चिंतामुक्त होतो; फडणवीसांनी सांगितला तो किस्सा

सरकारनामा ब्युरो

Pune News : भाजप नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे आज (ता. २९) निधन झाले. त्यांच्या निधनांनतर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत बापट यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांची काम करण्याची पद्धत अतुलनीय असल्याचे सांगत बापट यांच्या आठवणींना उजाळा दिला. पुण्याच्या विकासात बापट यांचा मोलाचा वाटा असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच त्यांच्याबरोबर काम करतानाचे काही किस्सेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी फडणवीस यांना अश्रू अनावर झाले होते.

फडणवीस म्हणाले, "पुण्याच्या खाणीतून बाहेर आलेले अनमोल रत्न म्हणजे गिरीश बापट. आम्ही मॅजेस्टीक आमदार निवासामध्ये १५ वर्षे एकत्र राहिलो. ते आमच्यासाठी जेवण तयार करायचे. त्यांच्यात माणसे जपण्याची कला होती. चपराशापासून ते मंत्र्यापर्यंत त्यांनी माणसे जपली आहेत. बोलण्यात ते चपखल होते. कुणालाही न दुखावता शाल जोडे मारून आपले म्हणणे मांडत होते. पुण्याचा जडणघडणीत त्यांचा वाटा मोठा आहे. पक्षाच्या भिंतीपलिकडे त्यांचे संबंध होते. संसदीय कार्यमंत्री असताना मी मुख्यमंत्री म्हणून चिंतामुक्त असायचो. कसलीही वेळ आली तरी त्यातून ते मार्ग काढत होते."

गिरीशभाऊ आमचे नेते होते. त्यांच्या कामातून अनेक गोष्टी शिकण्यास मिळल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, "आणीबाणीच्या काळापासून कालपर्यंत आम्ही त्यांनाच नेते म्हणून पाहिले. असे नेते तयार होण्यासाठी ४० वर्षे लागतात. त्यांना सर्व क्षेत्रातील प्रचंड ज्ञान होते. त्यांच्या कामाची पद्धत अतुलनीय होती. कृष्णा खोरे महामंडळाचे प्रमुख म्हणून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात सिंचनाचे काम सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखे आहे. ते हरणारे नव्हते. आजारी असले तरी अचनाक जातील असे वाटले नव्हते. त्यांच्या जाण्याचे आमची मोठी हानी झाली आहे."

बापट यांना २०१४ पासूनच दिल्लीला जाण्याची खूप इच्छा होती, अशी आठवणही फडणवीस यांनी यावेळी सांगितली. फडणवीस म्हणाले, "२०१४ ला मी म्हणत होतो की भाऊ आता आपले सरकार येणार आहे. तुम्ही कशाला जाता दिल्लीला. त्यांची मात्र दिल्लीला जाण्याची प्रचंड इच्छा होती. त्यानंतर राज्यात मंत्री म्हणून काम करताना ते म्हणाले की बरे झाले मी येथे काम करतोय. दिल्लीला गेलो असतो तर हा अनुभव मिळालाच नसता. पण २०१९ ला काही झाले तरी लोकसभा निवडणूक लढायचीच अशी त्यांनी मानसिकता केली होती. त्यानुसार त्यांनी प्रचंड तयारी केली होती. ते लढले अन् जिंकून आले. आता त्यांना दिल्ली मानवली की नाही मानवली हे काही सांगू शकत नाही. पण आमचे भाऊ आमच्यात नाहीत ही फार दुःखाची गोष्ट आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT