Sharad Pawar_praveen darekar
Sharad Pawar_praveen darekar Sarkarnama
पुणे

मावळ गोळीबार झाला, तेव्हा शरद पवारांना जालियानवाला बाग हत्याकांड आठवले नाही?

उत्तम कुटे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पालिकेच्या पवना बंद जलवाहिनी योजनेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर मावळात (जि. पुणे) ९ ऑगस्ट २०११ रोजी अमानुष गोळीबार झाला. तेव्हा शरद पवार यांना जालियनवाला बाग हत्याकांड आठवले नाही. मात्र, लखीमपूरची घटना घडली आणि त्यांनी त्याची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली, अशा शब्दांत भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पवार यांना लक्ष्य केले. मावळ गोळीबार हा जालियानवालापेक्षा भयानक होता, असाही दावा त्यांनी केला. (When Maval firing took place, Sharad Pawar did not remember Jallianwala Bagh massacre?)

दरम्यान, लखीमपूर घटनेच्या निषेधार्थचा सरकारी बंद हा दमदाटी, मारहाण आणि दबावतंत्राचा वापर करून राज्यभर सोमवारी पाळण्यात आला, असा आरोपही दरेकरांनी केला. हा बंद ही या सरकारची नौटंकी होती. ती कळल्याने त्यांच्या बंदला प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून धाकदपटशा दाखवून त्यांनी तो केला. त्यात शेतकरी तसेच सर्वसामान्य नव्हते; तर फक्त राजकीय कार्यकर्ते होते, असा दावा त्यांनी केला.

मावळ गोळीबारात तालुक्यातील शिवणे, सोमाटणे, येळशे या तीन गावांतील एकेक शेतकरी बळी गेला होता. या घटनेची आठवण करून देण्यासाठी दरेकर यांनी सोमवारी या तीन गावांतील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. या वेळी त्यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. राजकारणासाठी महाआघाडी सरकारला लखीमपूर आणि मावळातल्या शेतकऱ्यांच्या भावनांचा चक्काचूर असा हल्लाबोल त्यांनी केला.

लखीमपूरची घटना दुर्दैवीच आहे. तिचे समर्थन करता येणार नाही. त्या प्रकरणी कारवाई होऊन मंत्रीपुत्राला अटकही झाली आहे. पण,त्याचे राजकारण करणे बरोबर नाही. ते करताना आपल्या पायाखाली काय जळतंय, हे या सरकारने पाहावे, असा टोला त्यांनी लगावला. या सरकारचा ढोंगीपणा उघ़ड करण्यासाठी तसेच त्यांना संवेदना नाही, हे सांगण्यासाठी मी येथे आलो आहे. मावळ गोळीबारातील शेतकऱ्यांसाठी व तालुक्यातील तेराशे शेतकऱ्यांच्या रखडलेल्या पुनर्वसनासाठी या सरकारने काहीही केले नाही, असा आऱोप त्यांनी केला.

कोकणात वादळ आले.पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात महापूर आला. अतिवृष्टीने विदर्भ आणि मराठवाड्यातीलच ही शेतकरी उद्‌ध्वस्त झाला. पण, त्यांना या सरकारने दमडीचीही मदत केली नाही. त्यांना पीकविमा दिला नाही. उलट त्यांच्या कृषीपंपाची वीज कापली, अशी तोफ त्यांनी डागली. लखीमपूरचे राजकारण करायचे सोडून सरकारने मावळातल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसन प्रथम करावे, अशी मागणी  त्यांनी केली. दुसऱ्या राज्यातले राजकारण करायचे आणि इथल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचे, हे चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT