Aaditya Thackeray on Nagpur Airport
Aaditya Thackeray on Nagpur Airport 
राज्य

नितेश राणेंच्या ‘त्या’ ट्विटनंतर आदित्य ठाकरेंनी ताडोबा सफारी आटोपती घेतली...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : युवा सेनेचे अध्यक्ष व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सोमवारपासून चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्रदर्शनासाठी आले होते. हा त्यांचा शासकीय दौरा नव्हता. त्यामुळे ते सुटी घालवायला ताडोबाला गेले होते, असे मानले जात आहे. दरम्यान नितेश राणे यांनी ‘महाराष्ट्र कोरोनाने अडचणीत असताना आदित्य फिरायला निघाले’, असे आशयाचे ट्विट केले. त्यामुळेच की काय पण आज आदित्य यांनी मुबईकडे प्रयाण केले. नागपूर विमानतळावर माध्यम प्रतिनिधींशी न बोलता त्यांनी ‘सटकून’जाणे पसंद केले. 

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे वन्यजीव प्रेम सर्वत्र माहितीच आहे. उद्धव ठाकरे अनेकदा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र दर्शनासाठी येऊन गेले आहेत. हमखास व्याघ्र दर्शनासाठी ताडोबा प्रसिद्ध आहे. म्हणून अनेक सेलिब्रिटी इथे येतात. त्यातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ताडोबात येऊन गेले. त्यांच्या या दौऱ्याबाबत प्रशासनाकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आली.

सोमवारी दुपारी आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले आणि बुधवारी दुपारी ते नागपूरमार्गे मुंबईला रवाना झाले. आदित्य ठाकरे हे परवा दुपारपासून चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथे मुक्कामाला होते. प्रशासनाकडून हा त्यांचा खाजगी दौरा असल्याचे सांगण्यात आले. ते घोसरी येथील एका खाजगी मालकीच्या रिसॉर्ट वर थांबले होते. मात्र त्यांच्यासोबत वनविभागाने सचिव मिलिंद म्हैसेकर आणी एमटीडीसीचे एमडी आशुतोष सलील देखील होते. परवा दुपारी आल्यावर त्यांनी खुटवंडा गेट वरून ताडोबाची सफारी केली. मंगळवारीही ते या दोन अधिकाऱ्यांसोबत ताडोबाच्या आत गेले होते. पण ती सफारी नव्हती. बुधवारी सकाळी परत त्यांनी ताडोबाची सफारी केली आणि दुपारी दीड वाजता मुंबईकडे रवाना झाले. नववर्षाच्या सुरूवातीला जानेवारीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सहकुटुंब ताडोबात येऊन गेला.

आदित्य ठाकरे यांचा हा शासकीय दौरा नव्हता, तरीही शासकीय लोक त्यांच्यासोबत होते. इतर अधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते आदींना त्यांच्या या दौऱ्याची कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. त्याचा हा दौरा ते आज परत जाईपर्यंत कुणालाही माहिती नव्हता. पण ताडोबा दौऱ्याबाबत नितेश राणे यांनी टिका केल्यानंतर यौ दौऱ्याचे बिंग फुटले. ‘मुंबईचे पालकमंत्री काही दिवसांपासून ताडोबामध्ये सुटी घालवण्यात व्यस्त आहेत, मग मुंबईला कोण वाचवेल?’, अशी टिका राणे यांनी केली आहे. येथे ‘मुंबईचे पालकमंत्री’, हा उल्लेख त्यांनी चुकून केला असावा, असे सांगण्यात आले. कारण ठाकरेंवर टिका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. त्यामुळे त्यांचे टारगेट आदित्य ठाकरे हेच होते. महाराष्ट्र कोरोनाने अडचणीत असताना आदित्य फिरायला निघाले, असे ट्विट राणेंनी केले होते. त्यामुळेच की काय आज आदित्य ठाकरेंनी तडक नागपूर विमानतळ गाठले आणि माध्यम प्रतिनिधींना चकमा देत मुंबईसाठी उडून गेले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT